अमित शाह यांनी मराठीची मोहीम केराच्या टोपलीत टाकली; संजय राऊत यांचा घणाघात
संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधत म्हटले की, अमित शाहांनी मराठी भाषा शिकवण्याची मोहीम अक्षरशः केराच्या टोपलीत टाकली. दिल्लीच्या दबावाखाली शिंदे गट काम करत असून, शाहांनी घेतलेल्या या निर्णयावर त्यांनी चकार शब्दही काढला नाही, यावरून त्यांचा पक्ष अमित शाहच चालवतात हे उघड झाले आहे. ही मराठी माणसाची शोकांतिका आहे, असे राऊत म्हणाले.

राज्य सरकारने अमराठींना मराठी शिकण्यासाठी मोहीम हाती गेतली होती. पण दिल्लीतून सूत्रे हलली अन् अमित शाह यांनी मराठीची मोहीम केराच्या टोपलीत टाकली. तुम्ही त्यावर तोंडही उघडू शकला नाही. यातून तुमचा पक्ष अमित शाह हेच चालवतात हे उघड झालं आहे, असा जोरदार हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही परिवहन खात्याचा निर्णय पुढे ढकलून मीच तुमचा बॉस असल्याचं दाखवून दिलं आहे, असा दावाही राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला.
दिल्लीतून सूत्र हलवली जातात. त्यांच्या पक्षाचे नेते अमित शाह आहेत, असं मी काल म्हणालो होतो. त्यानुसार घडलं. मराठी भाषा आली पाहिजे, यासाठी परिवहन मंत्र्याने प्रचार केला. मुलाखती दिल्या. वर्ग सुरू केले. कारवाईच्या सूचना दिल्या. अर्थात मराठी आली पाहिजे हा धोरणात्मक निर्णय आहे. ही बाळासाहेबांच्या मूळ शिवसेनेची भूमिका आहे. ती काही शिंदे गटाची भूमिका नाही. एक निर्णय घेतला, तो राबवत असताना पावलं टाकल्यावर शेपूट का घातलं? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
हे मराठी माणसाचं दुर्देव
मराठीसाठी मंत्रिपद गेलं तरी चालेल, असं तुम्ही म्हटलं पाहिजे. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या विचारधारेच्या गोष्टी करतात. त्यांनी म्हटलं पाहिजे अमित शाह यांचा निर्णय मानणार नाही. आधी तीन तीन महिने आणि आता एक वर्षाने मराठी शिकण्यासाठी मुदत वाढवली आहे. मराठीची मोहीम अखेर अमित शाह यांनी केराच्या टोपलीत टाकली. तुमचा पक्ष अमित शाह चालवतात हे उघड झालं. या निर्णयानंतर तुम्ही तोंड उघडलं नाही. हे मराठी माणसाचं दुर्देव आहे, असं राऊत म्हणाले.
अन् बांबू घातला
प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे. ही चळवळ शिवसेनेने सुरू केली होती. रिक्षा चालकांचा रोजचा संबंध जनतेशी येतो. त्यांना मराठी आलीच पाहिजे. परिवहन मंत्र्यांनी ही चळवळ सुरू केली. ती किती टोकाला जाईल याबाबत साशंकता होती. दिल्लीतून बांबू येईल. तो बांबू जाईल. हे माघार घेतील. तसा बांबू आला. मुख्यमंत्र्यांच्या हाती बांबू आला आणि त्यांनी बांबू घातला असं म्हणता येईल. मुख्यमंत्र्यांचा आदेश त्यांना मान्य आहे, असं ऐकलं. अशी जोरदार कॅम्पेन करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती का? तुमचे पक्षप्रमुख अमित शाहांशी चर्चा केली होती का? हे स्पष्ट केलं पाहिजे, असा आव्हानच त्यांनी दिलं. तसेच मुख्यमंत्र्यांनी आपणच बॉस असल्याचंही दाखवून दिलं, असा दावाही त्यांनी केला.
