तर मी राजकारण सोडेन… संजय राऊत असं का म्हणाले? कुणाला दिलं आव्हान?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या 'चहावाला' असल्याच्या दाव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. मोदींनी खरोखरच चहा विकल्याचा पुरावा मिळाल्यास राजकारण सोडण्याची घोषणा करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले आहे.

तर मी राजकारण सोडेन... संजय राऊत असं का म्हणाले? कुणाला दिलं आव्हान?
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 24, 2026 | 10:38 AM

नरेंद्र मोदी गुजरातमध्ये चहा विकत होते असं सांगितलं जात आहे. मोदी खरोखरच चहा विकत असल्याचा मला कुणी पुरावा आणून दिला तर मी राजकारण सोडेन, असं आव्हानच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. मोदी ज्या काळात गुजरातमध्ये चहा विकत असल्याचा दावा केला जात आहे, त्या काळात गुजरातमध्ये ते रेल्वे स्टेशनच अस्तित्वात नव्हतं. प्लॅटफॉर्मच अस्तित्वात नव्हता. मग मोदींनी चहा कुठे विकला? असा सवालच संजय राऊत यांनी केला आहे. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी सामान्य कुटुंबातून आलो. मी नगरसेवकही झालो नसतो. पण मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलो. मोदी चहा विकत होते. ते पंतप्रधान झाले, असं म्हटलं होतं. त्याबाबत संजय राऊत यांनी विचारण्यात आलं असता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलं. देवेंद्र फडणवीस परत खोटे बोलत आहेत. मोदींनी लहानपणी चहा विकला नाही. कुणी मला मोदींनी लहानपणी चहा विकल्याचा पुरावा आणून दिला तर मी राजकारणच सोडेन, असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे.

फडणवीस खोटे बोलत आहेत

मोदी ज्या काळात चहा विकत होते, त्या काळात गुजरातमध्ये ते रेल्वे स्टेशनच अस्तित्वात नव्हतं. मोदींनी लहानपणी नदीत उडी मारली. मगर आली. मगरीची कुस्ती केली. अशा बाललीला सांगितल्या जात आहेत. त्यातला चहा विकण्याची ही बाललीला आहे. या दंतकथा पसरवल्या आहेत. नॉन बायोलॉजिकल माणूस चहा कसा विकेल? तो कशाला शाळेत जाईल? मोदी ज्या काळात चहा विकत असल्याचा दावा केला जातो, पण मोदींचा जन्मच झाला नाही, तर चहा कसे विकतील? फडणवीस खोटे बोलत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

सर्वच सामान्य घरातून येतात

या देशातील अनेक राज्यकर्ते सामान्य घरातून राजकारणात समाजकारणात आले आहेत. अब्दुल कलामही आले. सर्वच येतात. तुम्ही नगरसेवक होणार नव्हता, तुम्ही मुख्यमंत्री झाला. तुम्ही महाराष्ट्राचे आभार मानायला हवे होते. तुम्ही धर्माधर्मात तुकडे करत आहात, अशी टीका त्यांनी केली.

तुमच्यावर कुणाचा दबाव?

रॅपिडोबाईकमुळे रिक्षाचालकांचा रोजगार धोक्यात आला आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या राज्यातील हजारो रिक्षाचालक जे मराठी आहेत, सामान्य कुटुंबातील आहेत. या लोकांना आमदार, नगरसेवक होता येणार नाही. ते रिक्षा चालवतात. ते अशिक्षित आहेत. बहुसंख्य सुशिक्षित आहेत. रॅपिडो बाईकमुळे यांची रोजीरोटी संकटात आली आहे. एका बाजूला मराठी शिकायला सांगत आहात. त्याचवेळी त्यांची रोजीरोटी हिरावून घेत आहात. मी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिलं आहे. मी या रिक्षावाल्यांना त्यांच्याकडे घेऊन जाणार आहे. मी सरनाईक यांच्याकडे वेळ मागितला आहे. रॅपिडो कंपनीने अनेक मंत्र्यांच्या लग्न, दहीहंडीला प्रायोजकत्त्व दिलं आहे. म्हणून ही परतफेड करत आहात का? सरनाईक भूर्जीपाव विकायचे. रिक्षा चालवायचे. उपमुख्यमंत्री रिक्षा चालवायचे. मग या गरीब रिक्षाचालकांसाठी काहीच का करत नाही? तुमच्यावर कुणाचा दबाव आहे? असा सवाल त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us