Sharad Pawar: संसदीय कारकीर्दीचा हीरक महोत्सव साजरा करणारा ‘बाप’माणूस; लेकीच्या त्या भावनिक पोस्टची चर्चा, पवारांच्या राजकीय पॉवरला 60 वर्षे पूर्ण
Supriya Sule on Sharad Pawar: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला आज 60 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यासाठी एक्सवर एक खास पोस्ट लिहिली आहे. जनतेच्या प्रेमाबद्दल आभार मानत त्यांनी खास फोटोही शेअर केला आहे.

Supriya Sule on Sharad Pawar: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला आज 60 वर्षे पूर्ण झाली. शरद पवार यांनी राज्याच्याच नाही तर देशाच्या राजकारणातच मोठी भूमिका निभावली आहे. त्यांनी मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री, कृषी मंत्री म्हणून अनेक जबाबदाऱ्या लिलया पार पाडल्या. पवार हे अनेकांचा राजकीय गुरू आहेत. त्यांच्या शिस्तप्रिय आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाचे कौतुक अनेक जण करतात. अनेक राजकीय नेते त्यांचे चाहते आहेत. त्यांनी देशाच्या राजकारणातच नाही तर समाज कारणात, कृषी, सहकार, सांस्कृतिक, क्रीडासह अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या या चढत्या आलेखाचा साक्षीदार राज्याचा आणि देशाचा इतिहास आहे. त्यांच्या या कारकीर्दीविषयी अनेक जण भरभरून बोलतात. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी वडिलांच्या या संसदीय कारकीर्दीच्या हीरक महोत्सवाबद्दल भावनिक पोस्ट केली आहे. त्यांनी एक्सवर त्यांच्या हँडलवरून खास पोस्ट लिहिली आहे.
सुप्रिया सुळे यांची पोस्ट काय?
शरद पवार यांच्या सार्वजनिक व संसदीय जीवनाला आज साठ वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होत आहे. 1967 मध्ये सुरु झालेला त्यांचा जनसेवेचा प्रवास आजही तितक्याच ऊर्जेने आणि निष्ठेने पुढे जात आहे. महाराष्ट्र विधानसभेपासून ते संसद भवनापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने जनतेचा विश्वास संपादन केला आहे असे खासदार सुळे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या दीर्घ वाटचालीत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेले कार्यकर्ते, सहकारी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जनतेची साथ, हीच त्यांच्या यशाची खरी ताकद आहे. पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा आगामी काळातही सर्वांना नवी ऊर्जा देत राहो, हीच सदिच्छा. अशी पोस्ट सुळे यांनी लिहिली आहे.
आदरणीय पवार साहेब यांची संसदीय कारकीर्द आज साठाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. या सहा दशकांच्या काळात कित्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी सहा वेळा तर एकदा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. तब्बल सात वेळा ते लोकसभेत… pic.twitter.com/rLkURdFVqV
— Supriya Sule (@supriya_sule) February 22, 2026
तरुण मुख्यमंत्री ते कृषीमंत्री, मोठा राजकीय प्रवास
12 डिसेंबर 1940 रोजी शरद पवार यांचा जन्म झाला. 1956 साली त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंब्यासाठी विद्यार्थी मेळावा घेतला होता. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी विद्यार्थी संघटनेत काम केले. एका भाषणा दरम्यान यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना हेरले. त्यांचा युवक काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. पुढे ते राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1966 मध्ये त्यांना युनोस्कोची शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी युरोपियन देशांना भेट दिली.
त्यानंतर 1967 मध्ये ते बारामती मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभा लढले आणि जिंकले. वयाच्या 29 व्या वर्षी त्यांना वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले. 1972 आणि 1978 मध्ये त्यांचा विजय झाला. पुढे वसंतदादा पाटील यांचे सरकार त्यांनी पाडले. 18 जुलै 1978 साली शरद पवार पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. ते राज्याचे सर्वात तरूण मुख्यमंत्री होते. 1980 साली इंदिरा गांधींच्या काळात त्यांचे सरकार बरखास्त झाले.
1984 साली शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. पण ते केंद्रात गेले नाही. 1985 साली विधानसभा निवडणूक जिंकले. पुढे 1987 मध्ये राजीव गांधीं यांच्या उपस्थित ते पुन्हा काँग्रेसमध्ये परत आले. त्याचवेळी त्यांची मुख्यमंत्री म्हणून वर्णी लागली. तर 1990 मध्ये भाजप शिवसेनेने कडवे आव्हान देऊनही त्यांनी अपक्षांच्या पाठिंब्यावर सरकार तयार केले. 4 मार्च 1990 रोजी पवार हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नरसिंहराव पंतप्रधान झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार हे संरक्षणमंत्री झाले. पुढे सुधाकरराव नाईक यांच्या राजीनाम्यानंतर 1993 मध्ये त्यांनी चौथ्यांचा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण हे पद औटघटकेचे ठरेल. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आले. 1996 मध्ये ते बारामतीतून लोकसभेसाठी निवडून गेले. 1997 मध्ये त्यांनी सीताराम केसरी यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली. पण ते हरले. दोन वर्षांनी सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाच्या मुद्दावर त्यांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. 2004 मध्ये ते देशाचे कृषीमंत्री झाले. 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचे जाहीर केले आणि तेव्हापासून ते राज्यसभेवर आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव राहिलेला आहे.
