धनुष्यबाण चिन्ह गोठवायला का सांगितलं? कोर्टात नेमकं काय घडलं? संजय राऊत यांचा मोठा दावा काय?
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली. या अनपेक्षित मागणीवर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोर्टाने पर्याय विचारल्याने चिन्ह गोठवण्याचा प्रस्ताव आमच्या वकिलांनी मांडला, असे राऊत म्हणाले. कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांच्या युक्तिवादाचे त्यांनी कौतुक केले.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू असताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी चिन्ह गोठवण्याची मागणी केली. ठाकरे गटाकडून चिन्ह मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न होतील, अशी अपेक्षा असताना ठाकरे गटाकडून झालेल्या अनपेक्षित मागणीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाने केवळ पर्याय विचारल्याने चिन्ह गोठवण्याचा पर्याय आमच्याकडून देण्यात आल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा दावा केला आहे.
ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि वकील देवदत्त कामत यांनी काल केलेल्या युक्तिवादाचं संजय राऊत यांनी कौतुक केलं आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही. काल युक्तिवाद झाला आहे. सिब्बल आणि कामत यांनी चांगले तांत्रिक मुद्दे मांडले आहेत. कपिल सिब्बल आणि कामत यांचा युक्तिवाद स्पष्ट आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे यांचं आहे. त्यानंतर कोर्टाने त्यांना चिन्हाबाबत पर्याय विचारला. त्यावर त्यांनी चिन्ह गोठवावं असं सूचवलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
तावडेंचं कौतुक
यावेळी त्यांनी भाजपचे नेते विनोद तावडे यांचं कौतुक केलं. विनोद तावडे यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यावर राऊत यांनी भाष्य केलं. मराठी माणसावर जबाबदारी टाकली ही चांगली गोष्ट आहे. विनोद तावडे हे जुन्या फळीतील नेते आहेत. भाजप-शिवसेना युतीच्या बाजूचे आहे. जुन्या फळीतील नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आस्था आहे. मंत्री असताना त्यांचे तिकीट कापले. त्यांना अज्ञातवासात जावं लागलं. पण कर्तृत्व काही लपत नाही. त्यांना आमच्या शुभेच्छा आहे, असं त्यांनी सांगितलं.
वहिनी साहेबांना वेदना होत नाही का?
दरम्यान, चाकणसह राज्यात मुलींवर होत असलेल्या अत्याचारावरून राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. अशा घटना घडत असल्याने लोकांमध्ये चीड आहे. लोकं रस्त्यावर आहेत. काय करत आहेत राज्याचे मुख्यमंत्री? तुम्हाला महिला आरक्षण बिल मंजूर करायचं आहे. ते आधीच मंजूर झालेलं आहे. आता ड्युप्लिकेट विधेयक मंजूर करत आहे. ज्या कोवळ्या मुलींवर तुमच्याच राज्यात ज्या पद्धतीने अत्याचार सुरू आहेत. तुम्हाला, सरकारला, सरकारच्या वहिनी साहेबांना वेदना होत नाही का? असा सवाल त्यांनी केला.
ते तर फेल्युअर मंत्री
तुम्ही सर्व विषयावर पोपटपंची करता. मी महाराष्ट्रातच राहीन, दिल्लीत जाणार नाही, यावर मत व्यक्त करता. शिवसेनेवर मत व्यक्त करता. सुप्रीम कोर्टात काय निकाल लागणार हे बेशक ठोकता. या राज्यात कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहेत. राज्यात मुलींचा सर्पदंशाने मृत्यू होतो. त्यावर काही तरी बोलावं वाटतं का? पोलिस यंत्रणा बलात्कारांना वाचवत आहे. पोलीस संरक्षणात बेकायदेशीरपणे राज्य सुरु आहे. फडणवीस याबाबत फेल्युअर मंत्री आहेत. अमेरिकेचा हायकमिशनर मुंबईत आला. महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यामुळे फडणवीस हे कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. कुणी सांगितलं? हेच ते हायकमिशनर ते जम्मू काश्मीरमध्ये बोलले. त्यांना मुंबईवरील अत्याचार दिसले नाही? सर्पदंशाने मुली मेल्या ते दिसलं नाही? हे व्यापारी लोक आहेत, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
पोलीस आयुक्तांना थेट आव्हान…
यावेळी त्यांनी नवी मुंबईतील बलात्कार प्रकरणावरून थेट पोलिसांनाच आव्हान दिलं. साहिल देविदास चौगुले याने एका मुलीवर अत्याचार केला. आणि पळून गेला. त्याविरोधात अवधेश शुक्ला या आमच्या कार्यकर्त्याने आवाज उठवला. त्यानंतर आरोपी पकडला गेला. आता जामिनावर आहे. अवधेश शुक्लाने प्रकरण लावून धरलं. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. न्याय मागण्यासाठी मुलगी महिला आयोगाकडे जाऊन थकली. रबाळे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत हे नोटीस बजावून अवधेश यांना बोलावतात आणि चार चार घंटे बसवून ठेवतात. बाळकृष्ण सावंत गुन्हे मागे घ्यायला सांगत आहेत. धमकी देत आहे. खोट्या प्रकरणात आत टाकण्याची धमकी दिली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
पोलिस आयुक्तांना माझं आव्हान आहे, अवधेशवर खोटी केस टाकाच. मी बघतो. तुरुंगात टाकण्याची धमकी पोलीस देत असेल तर राज्यात मुलींवर अत्याचार होतीलच. पोलिसांना कायद्याचं पालन करावं अशी इच्छाच नाही. पोलीस आयुक्तांना आव्हान आहे, हे धमकीचं प्रकरण वेळीच मार्गी लावा. नाही तर मी मार्गी लावेन. साहील देवीदास चौगुले हा सत्ताधारी गटाचा आहे म्हणून त्याला सोडता? एकनाथ शिंदेंना सवाल आहे अशा प्रकरणांना तुम्ही अभय देत आहात? अशी प्रकरणं या महाराष्ट्रात घडत आहे. त्यामुळे राज्यभरात मुलींवर अत्याचार सुरू आहेत. कुणी आवाज उठवला तर वरून दबाव येतो. कधी भाजप, मिंधे तर कधी अजितदादा गटाचा दबाव येतो, असा दावाही त्यांनी केला.