‘जय श्रीराम’नंतर ‘जय शिवराय’ म्हटलंच पाहिजे; उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले
दंगल झाल्यावर बंदोबस्त करायला. हे तुमचं बाळासाहेबांवरचं प्रेम. काढायची झाली तर तुमची सालटी खूप काढली जातील. एवढी सालटी निघतील कि गावात फिरता येणार नाही. तुम्ही आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंधेरीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी जोरदार भाषण केले. या भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजपसह अमित शाह, एकनाथ शिंदें यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी “जय श्रीरामनंतर जय शिवराय म्हटलंच पाहिजे”, अशा शब्दात भाजपला ठणकावून सांगितले.
“शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं नसतं आणि औरंगजेबाला मोकळं सोडलं असतं तर गुजरात बिजरात पहिलं औरंगजेबाच्या चरणी लीन झालं असतं. संपूर्ण देशच हिरवा झाला असता. त्यामुळे जय श्रीराम आणि जय शिवराय म्हटलंच पाहिजे”, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला ठणकावले.
एवढी सालटी निघतील कि गावात फिरता येणार नाही
“हिंमत असेल तर तुमच्या झेंड्यातील हिरवा काढून दाखवा. आम्ही जी पहिली पोटनिवडणूक लढवली ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच लढली होती. हिंदू जरी असला आणि कुरुलकर सारखा पाक धार्जिणा असला तरी तो आमचा नाहीच. आम्ही ९७ची निवडणूक लढवल्यानंतर महाजन वगैरे आले. तेव्हा मातोश्रीचे उंबरठे झिजवायचे. हे भाजप आणि संघावाले असेच आहेत. काड्या लावायच्या, पेटवायचे आणि बाजूला व्हायचे.बाबरीवरून वातावरण तापवले आणि बाबरी पडल्यावर आम्ही नाही केलं असं म्हणून नामानिराळे राहिले. हे तुमचं हिंदुत्व. हा तुमचा नामर्दपणा. बाळासाहेबांचा मतांचा अधिकार काढून घेतला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांचा मतांचा अधिकार काढला. तेव्हा भाजपचं सरकार होतं. भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आडवाणी उपपंतप्रधान होते. त्यांनी तेव्हा बाळासाहेबांना अटक झाली तर दंगल उसळेल म्हणून केंद्राचं दंगल नियंत्रक पथक, केंद्रीय राखीव दल भाजपने पाठवलं होतं. दंगल झाल्यावर बंदोबस्त करायला. हे तुमचं बाळासाहेबांवरचं प्रेम. काढायची झाली तर तुमची सालटी खूप काढली जातील. एवढी सालटी निघतील कि गावात फिरता येणार नाही. तुम्ही आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका, असा इतिहास उद्धव ठाकरेंनी सांगितला.
“महाराष्ट्रात जय शिवराय बोलावचं लागेल”
“एक वर्षापूर्वी आयोध्याच्या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. अजून त्या मंदिराचं कामच पूर्ण झालं नाही. तेव्हा शिवसैनिक नसते तर तुम्ही दिसलाच नसता. आम्ही हिंदूच आहोत. आम्ही जय श्रीराम बोलतो. तसं तुम्हाला महाराष्ट्रात जय शिवराय बोलावचं लागेल. जसं जय हिंद नंतर जय महाराष्ट्र बोलतो. तसंच जय श्रीरामनंतर जय शिवराय बोललंच पाहिजे”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
“संपूर्ण देशच हिरवा झाला असता”
“शिवराय नसते तर अमित शाह आणि मोदीच दिसले नसते. त्यामुळे आम्ही जय श्रीराम आणि जय शिवरायच बोलणार. आम्ही जन्मदात्या बापाला विसरत नाही. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं नसतं आणि औरंगजेबाला मोकळं सोडलं असतं तर गुजरात बिजरात पहिलं, औरंगजेबाच्या चरणी लीन झालं असतं. संपूर्ण देशच हिरवा झाला असता. त्यामुळे जय श्रीराम आणि जय शिवराय म्हटलंच पाहिजे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.