Ramdas Athawale: राज्यसभेसाठी रामदास आठवलेंचा पत्ता कट? कुठं करणार पुनर्वसन? कुणाला लागणार लॉटरी? पडद्याआड वेगवान घडामोडी
Ramdas Athawale will not contest Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी राज्याच्या सात जागा लढवण्याचा भाजपचा इरादा समोर येत आहे. एका जागेवर महाविकास आघाडीचा नेता निवडून येऊ शकतो. पण सध्याची खलबतं वेगळाच इशारा देत आहेत. तर रिपाई नेते रामदास आठवले यांचा पत्ता कट होण्याची शक्यता समोर येत आहे.

Ramdas Athawale will not contest Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे. महायुतीच्या पारड्यात सहा जागा, तर एका जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल. पण भाजप सातव्या जागेसाठी चाचपणी करत असल्याचे समोर येत आहे. त्यासाठी पडद्याआडून काही चाणक्य प्रयत्न करत असल्याचे म्हटले जाते. विधान परिषदेला जसं धक्कातंत्र देण्यात आले, तसाच गनिमीकावा राज्यसभेसाठी करण्यात येण्याची शक्यता आहे. अर्थात आज आणि उद्याच्या घाडमोडीनंतर हे चित्र स्पष्ट होईल. पण ताज्या अपडेटनुसार रिपाई नेते रामदास आठवले यांचा राज्यसभेसाठीचा पत्ता कट झाल्याचे मानले जात आहे. याचे संकेत स्वतः रामदास आठवले यांनी यापूर्वीच दिले होते. राज्यसभेसाठी आपण सहज निवडून येऊ, पण आपल्याला पुढील लोकसभा निवडणूक लढवायची आहे, अशी इच्छा त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. तेव्हापासूनच त्यांचे पुनर्वसन करुन मित्रपक्षाच्या एका जागेवर भाजपच्या नवीन चेहर्याला संधी देण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार विदर्भातील एका महिला उमेदवाराचं नाव गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत होतं. भाजपचे आता चार उमेदवार राज्यसभेवर जातील. तर एक अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एका जागेवर शिंदे सेनेचा उमेदवार असेल.
रामसदासभाईंचे पुनर्वसन कुठे?
राज्यसभा निवडणुकीत रामदास आठवलेंचा पत्ता कट होणार हे ओघाने आलेच होते. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या भेटीत रामदास आठवले यांना कल्पना देण्यात आली होती. रामदास आठवले यांनी काल दिल्लीत नितीन नबीन यांची भेट घेतली. महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळात पुनर्वसन करण्याचे भाजप पक्षश्रेष्ठींचे रामदास आठवले यांना आश्वासन दिल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजवटीत रामदास आठवले आठवलेंची दोन वेळा राज्यसभेवर वर्णी लागली. रामदास आठवले समाज कल्याण विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री होते. त्यांच्या उमेदवारीविषयी उलटसुलट चर्चा होत असल्या तरीही त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार नाही याची अगोदरच कल्पना होती असे त्यांच्या गेल्या आठवड्यातील विधानावरून समोर येत होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांची तातडीने भेट
दिल्लीतून आज मुंबईत परततातच रामदास आठवले यांनी तात्काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी जात भेट घेतली. रामदास आठवले शेवटच्या क्षणापर्यंत राज्यसभा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा करण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तर विकासकामांच्या निधीसंदर्भात भेट असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तर या भेटीची थोडक्यात माहिती रामदास आठवले यांनी ट्वीट करून दिली आहे. त्यांनी एक्स हँडलवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची माहिती दिली. “आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन येऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा झाली. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत पुढील रणनीती, समन्वय आणि व्यापक राजकीय घडामोडींवर विचारविनिमय करण्यात आला.” अशी माहिती त्यांनी दिली.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन येऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा झाली. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत पुढील रणनीती, समन्वय आणि व्यापक राजकीय घडामोडींवर विचारविनिमय करण्यात आला.@Dev_Fadnavis pic.twitter.com/D3nmsJ8CJf
— Ramdas Athawale (@RamdasAthawale) March 3, 2026
राज्यसभेसाठी निवडणूक कार्यक्रम काय?
राज्यसभेच्या 37 जागांसाठी 26 फेब्रुवारी रोजी नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. या 5 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज भरतील. तर 6 मार्च रोजी अर्जांची छाननी होईल. 9 मार्च रोजीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल.16 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर संध्याकाळी 5 वाजेपासून मत मोजणीला सुरुवात होईल. 20 मार्चपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
