बेस्टला ठेच, एसटी शहाणी होणार
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टला कंत्राटी तत्वावरील बसेसचा अनुभव चांगला नाही. त्यामुळे बेस्टला ठेच लागल्याने आता एसटी देखील सावधान झाली आहे.
अतुल कांबळे, TV9 मराठी, मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आता कंत्राटी तत्वावरील बसेसचा आधार घेतला जात आहे. मात्र बेस्टचा कंत्राटी तत्वावरील बस चालकांचा अनुभव फारसा चांगला नाही. त्यामुळे आता लालपरी एसटीनेही सावधानता बाळगण्याचा निर्णय घेतला आहे.
बेस्टचे कंत्राटी कर्मचारी पगार तसेच इतर देणी मिळण्यासाठी वारंवार संपाचे हत्यार उपसून प्रवाशांना वेटीस धरीत असल्याने एसटी महामंडळाने शहाणे हाेत तिने अशा खाजगी चालकांना नेमताना योग्य खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटीनेही बेस्टच्या धर्तीवर नवीन कंत्राटी तत्वावरील बस ताफ्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस साध्या श्रेणीच्या बीएस – 6 दर्जाच्या आहेत. बसेस कंत्राटी तत्वावर रायगड, रत्नागिरी, पुणे, सांगली, कोल्हापूर, धुळे, लातूर या विभागाकरीता चालविण्यात येणार आहेत.
एसटी महामंडळ कंत्राटी कर्मचाऱ्यां सात वर्षांच्या करारावर कामावर घेणार आहे. त्यासाठी एसटीच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकाने कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एक नियमावलीच जारी केली आहे.
पुरवठादारांनी या बसेस पाठवल्यावर यंत्र अभियंत्यांनी बसेसची तपासणी करावी. त्यात व्हेईकल ट्र्रॅकींग सिस्टीम आहे का, ई- टॅग लावले आहेत का, फिटनेस सर्टीफिकेट, रजिस्ट्रेशन आणि बस विमा नुतनीकरण केले आहे का अशा सर्व बाबींची कागदपत्रे तपासूनच कंत्राटी बस चालकांची नियुक्ती करण्यात यावी असे या नियमावलीत म्हटले आहे.
बसचालकाचा चालक परवाना, चालकाचा फाेटाे, पीएसव्ही बॅज, अनुभवाचा दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्रे तपासावे, त्यांना तपासनीनंतर सात दिवसांचे प्रशिक्षण देण्यात यावे, दर दाेन वर्षांनी चालकांची नेत्र तपासणी करून घावी असे परिपत्रक महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक ) यांनी एसटीच्या विभाग नियंत्रकांसाठी काढले आहे.
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टला कंत्राटी तत्वावरील बसेसचा अनुभव चांगला नाही. त्यामुळे बेस्टला ठेच लागल्याने आता एसटी देखील सावधान झाली आहे. बेस्टला सध्या मुंबई महानगर पालिकेच्या मदतीवर अवलंबून रहावे लागत आहे, बेस्टमधील कंत्राटी चालकांनी अपुरे वेतन तसेच अन्य मागण्याकरीता वारंवार संप पुकारत प्रवाशांना वेठीस धरले आहे.
या बस कंत्राटदाराच्या मालकीच्या असून त्यांची देखभाल देखील कंपनीच करणार आहे. तसेच चालकांना वेतन देण्याची जबाबदारी देखील कंत्राटदारांवरच आहे. तसेच त्यांना दर कि.मी. मागे ठराविक भाडे दिले जात आहे.
संप केल्यास बेस्ट प्रशासन कंत्राटदारांवर थातूर मातूर दंड करण्यावर समाधान मानत आहे. त्यामुळे कंत्राटी चालक केव्हा संप करतील याचा काही नेम नसल्याने प्रवाशांचा बेस्टवरील विश्वास डळमळीत झाला आहे.
सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एकूण 3875 बसेस अंतर्भाव आहे. त्यामध्ये 1099 भाडे तत्वावरील बसेसचा समावेश आहे. बेस्टने आपले किमान भाडे पाच रुपये करण्यापासून अनेक उपाय याेजले आहेत.