मोठी बातमी : काँग्रेस, आपपाठोपाठ ठाकरे गटाचाही नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार; संजय राऊत यांची घोषणा

| Updated on: May 24, 2023 | 10:45 AM

काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसने नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. आता ठाकरे गटानेही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 28 मे रोजी हा उद्घाटन सोहळा होत आहे.

मोठी बातमी : काँग्रेस, आपपाठोपाठ ठाकरे गटाचाही नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार; संजय राऊत यांची घोषणा
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : नव्या संसद भवनाचं उद्घाटन हे केवळ आपल्या नावाच्या पाट्या लागाव्यात म्हणून होत आहे. राजधानी दिल्लीत पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी अनेक इमारतींचं उद्घाटन केलं आहे. त्यावर त्यांचं नाव आहे. म्हणूनच नव्या संसद भवनाच्या पाटीवर आपलं नाव यावं म्हणून हा कार्यक्रम होत आहे. हा एक इव्हेंट आहे, असं सांगतानाच आदिवासी महिलेला आम्ही देशाच्या राष्ट्रपती बनवल्याचं भाजप सांगत होता. मग या आदिवासी महिला राष्ट्रपतीला संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातून का डावलण्यात आलं? असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा सवाल केला आहे.

सेंट्रल विस्टा प्रकल्प कोरोना काळात सुद्धा देशाच्या तिजोरीवर लाखो कोटींचा भार देऊन बनवला. त्याची खरच गरज होती का? फक्त पंतप्रधानांची इच्छा आहे म्हणून अर्ध्या दिल्लीवर बुलडोझर फिरवून हा प्रकल्प उभा केला. सध्याच्या दिल्लीतील अनेक इमारतींवर उद्घाटक म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नावाच्या पाट्या आहेत. फक्त त्या नावाच्या पाट्या उखडून नरेंद्र मोदींचं नाव यावं म्हणून हे काम केलं असेल तर देशाच्या इतिहासातून अशा प्रकारे नावे पुसली जाणार नाहीत, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

100 वर्ष संसद चालली असती

सध्याची संसद क्रांतिकारक आणि ऐतिहासिक आहे. याच इमारतीतून घटनेचा मसुदा तयार झाला. नवं सरकार याच इमारतीतून तयार झालं. ही इमार अजून 100 वर्ष चालली असती. या पेक्षाही ऐतिहासिक आणि जुन्या इमारती जगात आहे. त्या उत्तमपणे चालत आहेत. तुम्ही इमारत उभारली. आदिवासी महिलेला राष्ट्रपती केल्याचा ढिंढोरा पिटला. राष्ट्रपती म्हणून आदिवासी महिलेला बसवणाऱ्या सरकारने आदिवासी महिलेला का डावललं याचं उत्तर द्यावं लागेल, असंही ते म्हणाले.

आदिवासी राष्ट्रपतींना का डावललं?

संसदेच्या प्रमुख राष्ट्रपती असतात. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख आहेत. दोन्ही सभागृहाच्या प्रमुख आहेत. त्यांना या सोहळ्यातून डावलण्याचं कारण काय? पंतप्रधान आणि राष्ट्रपती एकत्र एका कार्यक्रमात असू शकतात. त्यात अडचण नाही. पण एका आदिवासी राष्ट्रपतीला डावलून… मी आदिवासी हा शब्द वारंवार उच्चारत आहे, कारण त्यांना राष्ट्रपती करताना आम्ही पहिल्यांदा आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवलं असं भाजप सांगत होते. मग नव्या संसदेचं उद्घाटन होत असताना आदिवासी महिलेची आठवण का झाली नाही? त्यामुळेच या कार्यक्रमावर आमचा बहिष्कार आहे, असं राऊत यांनी जाहीर केलं.

विस्तार करणं म्हणजे नवं संसद भवन नाही

आदिवासी महिला राष्ट्रपतीला संसद भवनाच्या कार्यक्रमातून डावलल्याबद्दल आम्ही काँग्रेससह सर्वांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. इमारतीचं उद्घाटन आणि संसद भवनाचं उद्घाटन यात फरक आहे. इंदिरा गांधी यांनी संसदेच्या विस्तारीत इमारतीची पायाभरणी केली. राजीव गांधींच्या हातूनही तेच झालं. विस्तार करणं म्हणजे नवं संसद भवन नाही. हे नवं संसद भवन आहे, असं सांगतानाच इतिहास बदलला जात आहे. काहीही न करता. इमारतीच्या उद्घाटनात आपल्या नावाच्या पाट्या लावण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे. आरएसएसचा संसदेशी काहीही संबंध नाही, असंही त्यांनी सांगितलं.