नोकर भरतीबाबत सरकारकडून अध्यादेश जारी, महापोर्टल बंद होणार?

| Updated on: Feb 20, 2020 | 10:37 PM

फडणवीस सरकारच्या काळात महापोर्टलद्वारे (Maha pariksha portal) सरकारी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, ठाकरे सरकारने यात बदल करण्याच निर्णय घेतला.

नोकर भरतीबाबत सरकारकडून अध्यादेश जारी, महापोर्टल बंद होणार?
Follow us on

मुंबई : सततच्या तक्रारींनंतर ठाकरे सरकारने नोकर भरती करणाऱ्या महापरीक्षा पोर्टलबाबत (Maha pariksha portal) एक अध्यादेश काढला आहे. यात सरकारने महापरीक्षा पोर्टल थेट रद्द करण्याऐवजी परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात महापोर्टलद्वारे (Maha pariksha portal) सरकारी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याबाबत  परीक्षार्थींकडून वारंवार तक्रारी येत होत्या. त्याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सातत्याने ठाकरे सरकारकडे महापोर्टल रद्द करण्याची आग्रही मागणी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर परीक्षा पद्धतीत बदलाचा आदेश काढण्यात आल्याचं बोललं जात आहे.

राज्य सरकारने महापरीक्षा पोर्टल अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल करुन सुधारीत कार्यपद्धतीबाबत आदेश दिले आहेत. या एकूण चार मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले. सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळ तांबे यांनी नव्या परीक्षा प्रक्रियेत एमपीएससीचाही समावेश करण्याची आणि मागील परीक्षा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

राज्यमंत्री सतेज पाटील यांनी देखील सरकारच्या या आदेशावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.


सरकारी नोकर भरतीची प्रक्रिया करणाऱ्या महापरीक्षा पोर्टलवर मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून अनेक गंभीर आक्षेप घेतले जात आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांचा रोष लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी देखील यात लक्ष घातलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याची मागणी जोरदारपणे लावून धरली होती. लवकरच महापरीक्षा पोर्टल रद्द करु असंही आश्वसन सुप्रिया सुळे यांनी दिलं होतं.

शिवाय सत्यजीत तांबे यांनी नुकतंच महापोर्टल बंद न केल्यासा विधानभवनासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

शासकीय नोकरभरतीसाठी यापूर्वीच्या सरकारने (फडणवीस) सुरु केलेलं महापोर्टल बंद करावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. या सेवेत पारदर्शकता नाही अशी उमेदवारांची तक्रार असून पात्र उमेदवारांवरही अन्याय होतोय. त्यामुळे ते बंद व्हावे ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

सत्यजीत तांबेंचा इशारा

“सरकारने महापरीक्षा पोर्टल स्थगित केले असले, तरी रद्द करण्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सरकारने तातडीने महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याविषयी घोषणा करावी”, अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी चार दिवसांपूर्वीच केली होती. (Satyajeet Tambe on Mahapariksha portal). तसेच या परीक्षा घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करावी आणि फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या भरत्यांमध्ये झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करावी, अशीही मागणी सत्यजीत तांबे यांनी केली होती.

“ज्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा व्यवस्था उभी केली त्यांचाच त्यावर विश्वास राहिला नसेल तर विद्यार्थ्यांचा विश्वास बसेल अशी व्यवस्था निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणूनच महापरीक्षा पोर्टल रद्द करुन एक अशी व्यवस्था उभी करु जी पारदर्शी असेल, त्यावर लोकांचा, युवकांचा विश्वास असेल. त्यातून निपक्ष पद्धतीने सरकारी नोकऱ्यांची भरती होईल.” असं सत्यजीत तांबे म्हणाले होते.

संबंधित बातम्या 

तातडीने महापरीक्षा पोर्टल बंद करावं, अन्यथा धडक मोर्चा : सत्यजीत तांबे