धक्कादायक घटना, होळीचा रंग झाला बेरंग, खदाणीत बुडून दोघा जणांचा मृत्यू

| Updated on: Mar 25, 2024 | 8:43 PM

सर्वत्र होळी आणि धुलवडीचा सण साजरा होत असताना मुंबईतील उपनगर दहीसर येथील एका खाजगी जागेतील खदानीत पोहायला गेलेल्या दोघा जणांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे.

धक्कादायक घटना, होळीचा रंग झाला बेरंग, खदाणीत बुडून दोघा जणांचा मृत्यू
drowning
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई : होळी आणि धुळवड राज्यभर साजरी केली जात असताना मुंबईतील उपनगरी दहीसर येथील एका खाजगी जागेतील खदानीत उतरलेल्या दोघा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दहीसरच्या हनुमान टेकडी, अशोकवन परिसरातील जय महाराष्ट्र खदान येथे दोन जण खदानीच्या पाण्यात उतरले. त्यांना पोहता येत नसल्याने पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांच्या बचावासाठी प्रयत्न केला. परंतू त्यात त्यांना यश आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबईसह राज्यात होळी आणि धुळवडीचा सण साजरा होत असताना मुंबईचे पश्चिम उपनगर असलेल्या दहीसर परिसरातील एका खदानीत सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली आहे. येथील सुरज पटेल मार्ग, हनुमान टेकडी, अशोक वन परिसरातील जय महाराष्ट्र खदानीत दोन जण पाण्यात उतरले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यांन मदतीसाठी धावा घेतला. त्यांचा आवाज ऐकून त्या परिसरातील नागरीकांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्सी आणि इतर साहीत्याच्या मदतीने आधी एकाला बाहेर काढले. मनोज रामचंद्र सुर्वे ( 45 ) तसेच चिंतामणी वारंग ( 43 ) अशा दोघांना 108 एम्ब्युलन्सने शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषीत केले आहे.

होळी आणि धुळवडीच्या निमित्ताने अनेक जण समुद्रात किंवा खदानीत मौजमस्ती करण्यासाठी जीव धोक्यात घालून उतरत असतात. त्यात दरवर्षी मनुष्यहानीच्या घटना घडत असतात. दहीसरच्या घटनेने आता पुन्हा बेकायदेशीर खदानीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या परिसरातीस अशा धोकादायक ठिकाणांचे प्रवेश बंद करायला हवेत अशी मागणी होत आहे.