विरोधकांनी कोंडीत पकडलं, …आणि उदय सामंत यांनी भर विधान परिषदेत केली मोठी घोषणा

| Updated on: Mar 21, 2023 | 7:46 PM

विधान परिषदेत आज विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारच्या बाजूने मंत्री उदय सामंत भूमिका मांडत असताना अनिल परब, एकनाथ खडसे यांनी रोखठोक भूमिका मांडली. त्यामुळे अखेर उदय सामंत यांना मोठा निर्णय जाहीर करावा लागला.

विरोधकांनी कोंडीत पकडलं, ...आणि उदय सामंत यांनी भर विधान परिषदेत केली मोठी घोषणा
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कुटुंबियांना धमकी प्रकरणी आज विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच घमासान रंगलेलं बघायला मिळालं. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी संबंधित प्रकरणात आरोप करण्यात आलेले ठाणे महापालिकेचे सहायक आयुक्त महेश अहिर यांच्या निलंबनाची मागणी करत राज्य सरकारला अनेक प्रश्न विचारले. अनिल परब यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी या मुद्द्यावरुन राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण विरोधकांनी खमकेपणाने आपली भूमिका मांडल्याने अखेर उदय सामंत यांना महेश अहिर यांच्याकडून कार्यभार काढून घेण्यात आल्याची घोषणा करावी लागली.

महेश अहिर यांच्यावर गंभीर आरोप आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावायला जीवे मारण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली. संबंधित ऑडिओ क्लिप ही महेश अहिर यांनी बनवली असून त्यांनी आव्हाडांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याचा कट आखल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्यासह संपूर्ण महाविकास आघाडीकडून केला जात होता. विरोधकांकडून वारंवार महेश अहिर यांच्या निलंबनाची मागणी केली जात होती. विधान परिषदेत याच मागणीवरुन चांगलाच वाद रंगलेला बघायला मिळाला. त्यानंतर उदय सामंत यांनी याबाबत मोठी घोषणा केली.

सभागृहात आज नेमकं काय घडलं?

या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे, अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली. त्यांच्या या भूमिकेवर अनिल परब यांनी भूमिका मांडली. “महेश आहिर हा माणूस दोन वेळा निलंबित आहे. तरी याला चांगल्या ठिकाणी नियुक्ती मिळते. या माणसाला आमच्यापेक्षा जास्त बॉडीगार्ड आहे. एका क्लिपमध्ये तो म्हणतो, मी टाईट होऊन सीएमला फोन लागला. सीएमने ते काम करून टाकतो म्हणाले. हे सिद्ध झालेले गुन्हे आहेत. SIT चौकशी त्यांच्या गैरव्यवहाराबाबत होईल. तो इतके वर्ष ठाण्यातच आहे. त्याची एकाच जागी नियुक्ती कशी? हा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांशी संबधित आहे. याला आपण तात्काळ निलंबित करणार का? गुन्हे सिद्ध झाल्यास काय कारवाई करणार?” असे अनेक प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केले.

हे सुद्धा वाचा

सदनिका प्रकरणात अहवाल सादर झाला. त्यात ठाणे महानगर पालिकेच्या अधिकाराचा सहभाग नसल्याचे समोर आले आहे, असं उत्तर उदय सामंत यांनी अनिल परब यांच्या प्रश्नांवर दिलं. त्यानंतर अनिल परब यांनी “महोदय पण उत्तरात समोर आलयं. सरकार म्हणतयं उत्तरात भ्रष्टाचार झालाय. त्याच्या हातात कारभार आहे. आणि गैरव्यवहार झाला त्यात त्याचं नाव नाही? म्हणजे तोच गैरव्यवहार करणार आणि तोच चौकशी करणार?”, असे प्रश्न उपस्थित केले.

संबधित अधिकाऱ्याचे ज्या ऑडिओ क्लिपसमोर आल्यात जे काही आरोप आहेत, त्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहे, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. पण उदय सामंत यांच्या याच मुद्द्यावरुन अनिल परब यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. “जितेंद्र आव्हाड यांना धमकी देणारा ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी हा 10 वी पास आहे. मग हा अधिकारी झालाच कसा? 70 हजार पगार असणारा व्यक्ती बॉडीगार्डसह कसा काय फिरतो? तोच व्यक्ती म्हणतो की मी दारू पिऊन सीएमला फोन लावला होता. या प्रकरणाची चौकशी करा”, अशी मागणी अनिल परब यांनी केली.

विधान परिषदेत नेमकं कोण काय म्हणालं?

अनिल परब : ज्याची चौकशी करायची आहे तो अजून पदावर कसा काय आहे? याला ताबडतोब निलंबित करणार आहात का? ज्या अधिकाऱ्यावर आरोप होत आहेत. तो 10-10 बॉडीगार्डसह फिरत आहे. याच्याकडे पैसा आला कुठून? याला निलंबित करा.

उदय सामंत : सहायक आयुक्त यांनी कुठंही चुकीचं केलं आहे, असं मी म्हणालो नाही.

सभागृहाच्या सभापती निलम गोऱ्हे : सीआयडी चौकशी सुरू आहे, असं आपण म्हणतात. पण सदनिका वाटपात महापालिका अधिकाऱ्याने भ्रष्टाचार दिसत आहे. या व्यक्तीवर आरोप स्पष्ट होतं आहे.

उदय सामंत : ठाण्याचा व्यक्ती आहे. म्हणून इतरांना गोवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतं आहे.

शशिकांत शिंदे : मुख्यमंत्र्यांच नावं घेऊन जर कोणी बोलत असेल तर चौकशी व्हायला हवी ना. एक अधिकारी म्हणतो की, मी रात्री दारू पिवून मुख्यमंत्र्यांना फोन करतो. याची चौकशी व्हायला हवी. आम्ही मागणी केली आहे की, त्याच्या शिक्षणाची चौकशी करा. कारण ते शिक्षण बोगस आहे. 500 सदनिका या व्यक्तीने विकल्या आहेत आणि तरी तूम्ही त्याला वाचवत आहात.

एकनाथ खडसे : त्या अधिकाऱ्याला मुख्यमंत्री कार्यालय पाठीशी घालतंय. हा जावई नाहीय. सभापतींनी मार्गदर्शन करुनही मुख्यमंत्री किंवा सरकार यांवर कठोर कारवाई करत नाहीत. मुख्यमंत्री आणि त्या अधिकाऱ्याचे थेट संबंध आहेत, असा माझा आरोप आहे. मुख्यमंत्र्यांनी येवून यावर खुलासा करावा

उदय सामंत : विरोधकांकडून जाणीवपूर्वक हे प्रकरण मुख्यमंत्र्यांशी जोडले जात आहे. शासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल. त्याकरता मुख्यमंत्र्यांनी येवून निवेदन करण्याची गरज नाही.