मुंबईची लाईफलाईन कोलमडली, लोकलने प्रवास करणार असाल, तर नक्की वाचा; अन्यथा फसाल!
भाईंदर ते नायगाव दरम्यान ओव्हेयरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत झाली असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या मुंबई लोकल विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर आज रविवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे मोठा गोंधळ उडाला. भाईंदर ते नायगाव या स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये (OHE) तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा फटका मुंबईकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांना बसला आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक कोलमडल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वेळेचे गणित कोलमडले. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७.५२ च्या सुमारास भाईंदर आणि नायगाव स्थानकादरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. विरारकडे जाणाऱ्या मार्गावरील ओव्हेयरहेड वायरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पश्चिम रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या तांत्रिक विभागाने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. या बिघाडामुळे सुरुवातीला दोन लोकल आणि एक मेमू (MEMU) गाडी मार्गावर अडकून पडल्या होत्या.
रेल्वे प्रशासनाने तातडीने १ लोकल आणि १ मेमू गाडी सुरक्षितपणे बाहेर काढली आहे. उर्वरित १ ईएमयू (EMU) गाडी अद्याप घटनास्थळी अडकलेली असून, तिला हलवण्यासाठी तातडीने डिझेल इंजिनची मदत घेतली जात आहे. सध्या वसई रोड स्थानकावरून तांत्रिक तज्ज्ञांची टीम आणि विशेष टॉवर वॅगन घटनास्थळी दाखल झाली आहे. युद्धपातळीवर सुरू असलेल्या या दुरुस्ती कामामुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी किमान एक तासाचा अवधी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान ऐन सकाळी कामावर जाण्याच्या वेळेत पश्चिम रेल्वेवरील लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. सध्या विरारपासून चर्चगेटकडे जाणाऱ्या स्थानकावरील फलाटांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे लोकलची वाट पाहता पाहता प्रवाशांच्या नाकी नऊ आले आहेत. सोशल मीडिया आणि स्थानकांवर सतत उद्घोषणा करत प्रवाशांना सातत्याने माहिती दिली जात असली, तरी उशिरामुळे होणारी धावपळ थांबण्याचे नाव घेत नाही.
प्रवाशांनी थोडा संयम बाळगा
रेल्वे प्रशासनाने या तांत्रिक बिघाडाची गंभीर दखल घेतली आहे. ही दुरस्ती लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचे आश्वासन रेल्वेने दिले आहे. प्रवाशांनी थोडा संयम बाळगावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.