राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाची हत्या, कोर्टाने तिघांना दोषी ठरवले तर महेश पाटील यांच्यासह 10 जण निर्दोष

राष्ट्रवादीचे नेते वंडार पाटील यांचा मुलगा विजय पाटील यांची हत्या झाली तेव्हा शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील हे न्यायालयात हजर असल्याचे पुरावे दिल्याने त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाची हत्या, कोर्टाने तिघांना दोषी ठरवले तर महेश पाटील यांच्यासह 10 जण निर्दोष
kalyan court
| Updated on: Aug 04, 2025 | 7:12 PM

साल २००७ मध्ये कल्याण पूर्व येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वंडार पाटील यांचा मुलगा विजय पाटील यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी 18 वर्षांनंतर कल्याण न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. न्यायालयाने तीन आरोपींना दोषी ठरवले असून, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांच्यासह दहा जणांची निर्दोष सुटका केली आहे. विजय बाबुराव वाकडे, साजिद हमीद शेख आणि सुनील रामचंद्र भोईर या तिघांना दोषी ठरवले तर हत्येच्या वेळेला महेश पाटील न्यायालयात असल्याचे सिद्ध झाल्याने महेश पाटील यांची सुटका झाल्याचे त्यांच्या वकीलांनी सांगितले.

२३ मार्च २००६ रोजी गोलवली येथे होळीच्या कार्यक्रमात बाळा भोईर यांची हत्या झाली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी १० एप्रिल २००७ रोजी विजय पाटील यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप होता. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांच्यासह एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि गेल्या १८ वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. याप्रकरणी न्यायालयाने विजय बाबुराव वाकडे, साजिद हमीद शेख आणि सुनील रामचंद्र भोईर या तिघांना दोषी ठरवले आहे. त्यांना सध्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून, ७ ऑगस्ट रोजी त्यांना शिक्षा सुनावली जाईल.

 ७ ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार

या प्रकरणात ज्या दहा जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे, त्यात शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांचाही समावेश आहे. आरोपींचे वकील हरीश सर्वोदय यांनी सांगितले की, ज्यावेळी विजय पाटील यांची हत्या झाली, तेव्हा महेश पाटील सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या वेळेत कल्याण न्यायालयात हजर होते. याचे पुरावे आम्ही सादर केले. त्यामुळे त्यांची निर्दोष सुटका झाली.या प्रकरणातील तपास अधिकारी यांचे निधन झाले असून, मृत व्यक्तीच्या शरीरात गोळी आढळली नाही, असेही वकील हरीश सर्वोदय यांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयाने नेमक्या कोणत्या कलमांखाली तिघांना दोषी ठरवले आहे, हे ७ ऑगस्ट रोजी शिक्षेच्या सुनावणीवेळी स्पष्ट होईल. दरम्यान, या प्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही वकिलांनी स्पष्ट केले आहे. सध्या न्यायालय परिसरात तणावाचे वातावरण असून, सर्वांचे लक्ष ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या शिक्षेच्या सुनावणीकडे लागले आहे.