काँग्रेसमुळे मविआत फूट? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले उद्धव ठाकरेंना…

महाविकास आघाडी म्हणून राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची कॉंग्रेसची भूमिका आहे. आघाडीचे प्रतिनिधी म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे आणि राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी द्यावी, असा आमचा प्रस्ताव आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी सांगितले.

काँग्रेसमुळे मविआत फूट? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले उद्धव ठाकरेंना...
Sanjay Raut harshwardhan sakpal
| Updated on: Feb 23, 2026 | 10:38 AM

आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांवरुन सध्या महाविकासआघाडीत मोठी फूट पडली आहे. या जागावाटपाच्या समीकरणावरून सध्या महाविकासआघाडीत मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यातच काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसला संधी देण्यात यावी, असा एक प्रस्ताव मांडला आला. या प्रस्तावामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.

काँग्रेसचा प्रस्ताव काय?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आगामी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाण्याची काँग्रेसची स्पष्ट इच्छा आहे. आमचा असा प्रस्ताव आहे की, मविआचे प्रमुख नेते म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर (MLC) जावे, तर राज्यसभेच्या (Rajya Sabha) जागेसाठी काँग्रेसला संधी देण्यात यावी, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.

संजय राऊत काय म्हणाले?

आता सपकाळ यांच्या प्रस्तावावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी सविस्तर भाष्य केले. हा प्रामुख्याने विधिमंडळाचा विषय आहे. जेव्हा आमचे तिन्ही पक्षांचे नेते (शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी) एकत्र बसतील, तेव्हाच कोणाला कोणती जागा द्यायची हे ठरवले जाईल. अद्याप याची कोणतीही अधिकृत कार्यवाही सुरू झालेली नाही, असे संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा विधिमंडळात सक्रिय व्हावे, ही आम्हा सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, त्यांची स्वतःची इच्छा काय आहे, याची चाचपणी आम्हाला करावी लागेल. तिन्ही पक्षांची भूमिका ऐकून घेतल्यावरच अंतिम निर्णय जाहीर होईल. अनेक नेते बाहेर मतप्रदर्शन करतात, त्यांना करु दे. मोदींच्या पक्षात मतप्रदर्शन करण्याला बंदी आहे. तिथे लोकशाही नाही. आमच्याकडे तीन स्वतंत्र पक्ष आहेत. मविआत लोकशाहीचा मान राखला जातो. प्रत्येकाने आपले मत व्यक्त केल्यावरही नंतर आम्ही त्यावर बसून चर्चा करतो. मग त्यानंतर त्यावर निर्णय घेतो तो मान्य करावा लागतो, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

यावेळी संजय राऊत यांनी महायुतीमधील अंतर्गत वादावर बोलताना जोरदार टीका केली. महायुतीत सध्या ‘सौ आचारी आणि रस्ता भिकारी अशी परिस्थिती आहे. कोणीही उठतो आणि काहीही बोलतो,” असे ते म्हणाले. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेचा आणि वाक्प्रचारांचा अभ्यास करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.