आदित्य ठाकरेंच्या पत्राने मुंबईतील बिल्डरांचे टेन्शन वाढले, पत्रात नेमकं काय म्हटलं?
मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून खासगी बांधकामांना एक आठवडा स्थगिती देण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी पत्रात केले आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा स्तर (AQI) दिवसेंदिवस खालावत चालला आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण शहरात प्रदूषणाचे साम्राज्य पसरले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी मुंबईतील सर्व खासगी बांधकामांना किमान एक आठवड्यासाठी स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यासोबतच त्यांनी इतर मुद्द्यांवरही लक्ष केंद्रीत केले आहेत.
आदित्य ठाकरेंनी दिलेल्या पत्रात नेमंक काय?
आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना एक पत्र दिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी काही बाबींकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण शहर प्रचंड धुके आणि धुळीच्या थराने झाकले गेले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना श्वास घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. अशा प्रदूषित वातावरणात कोणतेही शहर पर्यटकांना आकर्षित करू शकत नाही. नवीन गुंतवणूक आणू शकत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवू शकत नाही. त्यामुळे याबद्दल ठोस पावलं उचलावीत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
१. बांधकामांना स्थगिती (प्रदूषण नियंत्रण)
मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे खासगी बांधकामांना किमान एक आठवड्यासाठी तात्काळ स्थगिती द्यावी. त्यानंतर प्रत्येक विभागासाठी बांधकामाचे वेळापत्रक निश्चित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
२. खारफुटी (मॅन्ग्रोव्ह) संरक्षण
प्रकल्प राबवताना सुमारे ४५,००० खारफुटीची झाडे तोडण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. ही झाडे वाचवण्यासाठी प्रकल्पाचे नियोजन बदलून ते भूमिगत करावेत. लांब स्पॅनचे पूल वापरावेत. तसेच, मुंबईतील झाडे तोडून चंद्रपूरमध्ये वृक्षारोपण करण्याचा प्रस्ताव हा केवळ दिखावा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
३. बँक गार्डन (कुलाबा) आणि मैदाने
कुलाबा येथील नैसर्गिक मातीच्या मैदानात सिमेंटचे बांधकाम करून तिथे प्रवेश मर्यादित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला त्यांनी विरोध दर्शवला आहे. तसेच, शहरातील ज्या मैदानांचे व्यावसायिक कारणांसाठी टर्फमध्ये रूपांतर करून सर्वसामान्यांचा प्रवेश नाकारला जात आहे, अशा सर्व संस्थांचे लेखापरीक्षण (Audit) करण्याची मागणी केली आहे.
४. महालक्ष्मी रेसकोर्स
रेसकोर्स येथे भूमिगत वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव कंत्राटदारांच्या फायद्याचा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रेसकोर्सच्या सुशोभीकरणाचा खर्च क्लबने करावा, करदात्यांच्या पैशातून तो करू नये. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस भूमिगत पार्किंगला परवानगी देत नाहीत, त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
आज महापालिका आयुक्त भूषण गगराणी जी ह्यांना लिहिलेलं पत्र. एका बाजूला प्रदूषण तर दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचा ऱ्हास… दोन्ही महानगरपालिकेने थांबवणं गरजेचं आहे! pic.twitter.com/nmf4vVD6pY
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 22, 2026
आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख मागण्या काय?
वाढत्या धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील सर्व खासगी बांधकामांवर किमान सात दिवसांची बंदी घालण्यात यावी. स्वच्छ हवेच्या दृष्टीने आणि प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक प्रभागाच्या (Ward) स्थितीनुसार बांधकामांचे एक निश्चित वेळापत्रक तयार करावे. गेल्या वर्षी बोरिवली परिसरात प्रदूषणाची पातळी वाढल्यामुळे तेथील बांधकामांना आठवड्याभरासाठी स्थगिती देण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता संपूर्ण मुंबईत ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.
मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर रिअल इस्टेट प्रकल्प आणि पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. यातून उडणारी धूळ प्रदूषणास मुख्यत्वे कारणीभूत ठरत आहे. आदित्य ठाकरे यांच्या या मागणीनंतर आता महापालिका प्रशासन बांधकामांबाबत काही नियमावली जाहीर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
