
Kunbi Certificate issued in Marathawada : ओबीसी नेते 2 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयाविरोधात रान पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा जीआर ओबीसी प्रवर्गासाठी मृत्यूचा खलिता असल्याचा आरोप त्यांनी केला. पण आता ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्या नवीन दाव्याने या ओबीसी नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पण धक्का बसणार आहे. कुणबी जात प्रमाणपत्रासाठी मराठवाड्यात किती अर्ज प्राप्त झाले आणि किती जणांना कुणबी जात प्रमाणपत्र वाटण्यात आले याची धक्कादायक आकडेवारी तायवाडे यांनी समोर आणली आहे. त्यामुळे जरांगेंचे आंदोलन फुसका बार तर ठरले नाही अशी चर्चा होत आहे.
2 सप्टेंबर 2025 रोजीच्या GR ची चर्चा
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात ऑगस्टच्या अखेरीस 29 तारखेला उपोषणाची घोषणा केली. ते उपोषणा बसले. लाखो मराठा कार्यकर्ते तिथे तळ ठोकून होते. यामुळे मुंबापूरी जाम होण्यास सुरुवात झाली. काही लोक त्याविरोधात हायकोर्टात गेले. हायकोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर लागलीच राज्य सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यात चर्चेच्या फेऱ्या झाल्या. त्यानंतर 2 सप्टेंबर 2025 रोजीच्या जीआरवर उपोषण सुटले. हैदराबाद गॅझेटआधारे कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा मार्ग मोकळा झाला. तर सातारा गॅझेटवरही लवकरच निर्णय अपेक्षीत आहे. या जीआरविरोधात मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठिकाणी ठिकाणी आंदोलने आणि मोर्चाचे नियोजन केले आहे. तर तायवाडे यांच्या नवीन दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
केवळ 27 कुणबी दाखले
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 2 सप्टेंबर ते 7 ॲाक्टोबर या कालावधीत फक्त 73 अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी 27 अर्जच मंजूर झाल्याचा दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केला. 2 तारखेच्या जीआनंतर 35 दिवसांत मराठवाड्यात फक्त 27 अर्ज मान्य झाले. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचा सरकारी पुरावाच तायवाडे यांनी सादर केला.
तर मग रांगा लागल्या असत्या
जर सरसकट ओबीसी प्रमाणपत्र मिळाले असते तर रांगा लागल्या असत्या, असे झणझणीत अंजन त्यांनी या मुद्दावरून राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या डोळ्यांत घातले. ओबीसी नेत्यांनी अभ्यास करुन वक्तव्य करावे. बेजबाबदारपणे वक्तव्य करु नये. ओबीसी तरुणांनी केलेल्या आत्महत्यांसाठी आरक्षण संपलं म्हणणारे जबाबदार असल्याचा आरोप तायवाडे यांनी केला. 2 तारखेच्या जीआर चा ओबीसींना धक्का लागणार नाही, तायवाडे यांचा दावा खरा ठरतोय असे तरी समोर येत आहे.