राणे म्हणाले, मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार; नाना पटोले म्हणतात, भाजपच्या भविष्यवाणीला काही अर्थ नाही

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील ठाकरे सरकार मार्चमध्ये कोसळणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.

राणे म्हणाले, मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार; नाना पटोले म्हणतात, भाजपच्या भविष्यवाणीला काही अर्थ नाही
महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार : नाना पटोले
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 3:33 PM

नागपूर: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील ठाकरे सरकार मार्चमध्ये कोसळणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. राणेंच्या या भविष्यवाणीची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खिल्ली उडवली आहे. भाजप हा खोटी भविष्यवाणी करणारा पक्ष आहे. त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ उरला नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपवाले भविष्यवाणी करणारे आहेत. त्यांची भविष्यवाणी खोटी निघत आहे. त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. त्यांच्या भविष्यवाणीला अर्थ नाही. गेल्या दोन वर्षांपासून त्यांची भविष्यवाणी सुरूच आहे. आम्ही दोन वर्ष पूर्ण केले. आघाडी सरकार पाच वर्ष चालेल, असं पटोले म्हणाले.

नागपूरमध्ये निवडणूक होणार

यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. नंदूरबारची जागा भाजपला गेली आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसला आली आहे. तसेच मुंबईतील दोन जागांपैकी एक जागा शिवसेना आणि दुसरी भाजपला मिळाली आहे. मात्र, नागपूरमध्ये लढत होणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे. त्यात काँग्रेसचा विजय होणार हे निश्चित आहे, असं त्यांनी सांगितलं. आज अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया संपली. कुणी अर्ज मागे घेतले आणि कुणी नाही घेतले हे स्पष्ट होणार आहे. आमचे उमेदवार छोटू भोयर विजयी होतील हा आमचा विश्वास आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भाजप घाबरलेली दिसतेय

नागपूरची निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपकडून आमच्याकडे प्रस्ताव आला नाही. त्यामुळे नागपूरच्या जागेबाबत कोणताही निर्णय झाला नाही. त्यांच्याकडून प्रस्ताव आलाच नाही. त्यामुळे आता त्यावर अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही, असं त्यांनी सांगितलं. जागा कुणाकडे अधिक आहेत. नंबर कुणाकडे आहेत याला या निवडणुकीत काही अर्थ नाही, असंही ते म्हणाले. भाजप नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे भाजप घाबरली असल्याचं दिसतं. आम्हाला आमच्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी नेण्याची गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीविरोधात कोणतंही विधान नाही

राष्ट्रवादीत काहीच नाराजी नाही. छोटू भोयर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश देतील. त्यानंतर ते काम करतील. राष्ट्रवादी दुखावेल असं कोणतंही वक्तव्य आम्ही केलं नाही. महाविकास आघाडीत फूट पडेल असं काही केलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

संबंधित बातम्या:

आता मुंबईतील ‘या’ आठ मॉल्समध्ये रात्रीची पार्किंग करा; वाहन मालकांना मोठा दिलासा

भाजप पदाधिकारी अमोल इघे हत्या प्रकरण, संशयित आरोपी महिन्याभरापूर्वीच भाजपातून राष्ट्रवादीत?

Jalna | जालना एपीएमसी कार्यालयावर ईडीचा छापा, 10 ते 12 ठिकाणी ईडीची छापेमारी

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us