जनगणनेत ओबीसींचा कॉलम का नाही? विजय वडेट्टीवार संतापले; सरकारची नियतच…

पंतप्रधान मोदींनी ओबीसी जनगणनेचे आश्वासन दिले होते, मात्र केंद्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या जनगणनेच्या गॅझेटमध्ये ओबीसींचा कॉलमच नाही. यामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार संतप्त झाले आहेत. त्यांनी सरकारवर ओबीसी जनगणना न करण्याची 'नियत' असल्याचा आणि डेटाचा गैरवापर करण्याचा आरोप केला आहे.

जनगणनेत ओबीसींचा कॉलम का नाही? विजय वडेट्टीवार संतापले; सरकारची नियतच...
Vijay Wadettiwar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 14, 2026 | 4:38 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आणि संसदे बाहेर ओबीसींची जनगणना करणार असल्याची घोषणा केली होती. पण आज केंद्र सरकारने जारी केलेल्या जनगणनेच्या गॅझेटमध्ये ओबीसींचा कॉलमच ठेवला नाही. केंद्राने 40 प्रश्न विचारले आहेत. नको ते प्रश्न विचारले आहेत. मग त्यात ओबीसींचा कॉलम का नाही ठेवला? असा संतप्त सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारची नियतच ओबीसी जनगणना न करण्याची आहे. हे सरकार जुमलेबाज आहे, असा घणाघाती हल्लाही विजय वडेट्टीवार यांनी चढवला आहे.

केंद्र सरकारने जनगणनेसाठीचा गॅझेट जारी केला आहे. या गॅझेटमध्ये एकूण 40 प्रश्न देण्यात आले आहेत. जनगणना करताना हे प्रश्न विचारले जाणार आहेत. जात, धर्म, लिंग, नोकरीपेशा, कोव्हिडची लस घेतल्याचं ठिकाण आदी गोष्टी त्यात नमूद करण्यात आल्या आहेत. पण त्यात ओबीसींसाठीचा कॉलम नसल्याने ओबीसी नेते संतापले आहेत. विजय वडेट्टीवार यांनीही संताप व्यक्त केला आहे. ओबीसींची जात निहाय जनगणना करावी ही आमची मागणी होती. त्याला घाबरून मोदीजींनी संसदेत आणि बाहेर ओबीसींची जातनिहाय जनगणना करणार, अशी घोषणा केली होती. दुसऱ्या टप्प्यातल्या राजपत्राची म्हणजे गॅझेटची घोषणा झाली. मात्र त्यामध्ये ओबीसी कॉलम नाही. पण नको त्या गोष्टी विचारण्यात आल्या आहेत. 40 प्रकारची माहिती विचारण्यात आली आहेत, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

डेटाचा दुरुपयोग करायचा

सरकारला या डेटाचा दुरुपयोग करायचा आहे. जर सरकारला पुढील योजनांसाठी जनगणना करायची असेल तर मग ओबीसींचा यामध्ये कॉलम का नाही? असा सवाल करतानाच यावरून स्पष्ट आहे की, सरकारची नियत ओबीसी जनगणना करण्याची नाही. जुमलेबाज सरकारचा हा एक जुमला होता हे आता सिद्ध झालंय, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

नाही तर तुमचा एंड…

यावेळी त्यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली. सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये मोठा संघर्ष आहे. मात्र सत्तेचा मेवा रोज खात असल्यामुळे हा संघर्ष पुढे येऊ शकत नाही. पण तुम्ही भोळे असा किंवा खुळे भाजप तुम्हाला खाणारच आहे. तुम्हाला जर वाचायचं असेल तर हातात शस्त्र घ्या, नाहीतर तुमचा एंड अटळ आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

देश आंधळ्याच्या भरवश्यावर

पुण्यातील भोंदूबाबा प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पाय धुण्यापेक्षा पाय कापून घरी ठेवले असते तर अधिक पुण्य लाभलं असतं. हा देशच आंधळ्यांच्या भरोशावर चालवला जात आहे. देवाच्या नावावर सर्व बाजार मांडलाय. 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यापासून भोंदूगिरीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. पाय धुतले तर धुतले, पाणी पण पीत आहे, देश कुठल्या दिशेने चाललाय? पाय धुऊन जर पाणी पीत असेल तर जेवढे काही शिक्षण घेतलं आहे ते सर्व वाया गेलं असं त्याचा अर्थ आहे, अशी टीका त्यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us