महाराष्ट्रात अँटी मोदी करंट, ‘या’ जागांवर बसणार महायुतीला ब्रेक; श्रीमंत माने यांचा दावा काय?

लोकसभेच्या जागा पाहिल्या तर उत्तर प्रदेशनंतर दुसऱ्या नंबरच्या जागा महाराष्ट्रात आहेत. बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात जागांची घट होणार आहे. ही घट भरून काढण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रावर भाजपची भिस्त आहे. पण या दोन्ही राज्यातही घट झाली तर अडचण होईल. महाराष्ट्राचा निकाल हा भाजपला सत्तेत आणण्यासाठी निर्णायक असणार आहे.

महाराष्ट्रात अँटी मोदी करंट, या जागांवर बसणार महायुतीला ब्रेक; श्रीमंत माने यांचा दावा काय?
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 25, 2024 | 9:12 PM

राज्यातील पाच टप्प्यातील लोकसभेचं मतदान पूर्ण झालं आहे. आज देशातील सहावा टप्पाही पार पडला आहे. येत्या 1 जून रोजी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे कयास वर्तवले जात आहेत. मोदींची जादू तिसऱ्यांदा चालणार का? भाजप 400 पार करणार का? महाराष्ट्रात मोडतोड केल्यानंतरही भाजपला अपेक्षित जागा मिळणार का? या आणि इतर मुद्द्यांबाबत राज्यात वेगवेगळी मतमतांतरे व्यक्त केली जात आहे. प्रसिद्ध राजकीय विश्लेषक श्रीमंत माने यांनी लोकसभा निवडणुकीवर परखड भाष्य केलं आहे. राज्यातील ग्रामीण भागात अँटी मोदी करंट होता. तसेच राज्यातील काही भागात युतीची घोडदौड रोखली जाणार आहे, असं मत श्रीमंत माने यांनी व्यक्त केलं आहे.

राजकीय विश्लेषक श्रीमंत माने यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. यावेळी ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये अँटी मोदी करंट होता. तो करंट किती काम करतो त्यावर बरंचसं अवलंबून आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या बेल्टमध्ये जिथे कापूस आणि सोयाबीनचं मोठं उत्पादन होतं तिथे शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका सत्ताधाऱ्यांना बसेल. पूर्व विदर्भात कास्ट इक्वेशन अधिक निर्णायक ठरतील असं वाटतं. डीएमके फॉर्म्युला म्हणजे दलित, मुस्लिम आणि कुणबी… विशेषत: नागपूर, नागपूर शहर, वर्धा आणि चंद्रपूर येथे कुणबी फॅक्टर निवडणुकीवर परिणाम करेल. कुणबी फॅक्टर प्रामुख्याने काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याने पूर्वी जिथे दीड ते 3 लाखाने विजयी झालेले भाजपचे उमेदवार होते, त्यांना संघर्ष करावा लागला. तो संघर्ष दिसला आहे. कदाचित हा फॅक्टर काही ठिकाणचा निर्णय बदलूही शकतो, असं श्रीमंत माने यांनी म्हटलं आहे. विदर्भातील या जागा महायुतीचा रथ रोखू शकतात असा स्पष्ट अंदाजच त्यांनी वर्तवला आहे.

महाविकास आघाडी सरस

दोन निवडणुकीत मोंदीची लाट होती. आता ती दिसली नाही. राज्याची निवडणूक लोकल इक्वेशनवर गेली होती. राज्यात तुल्यबळ लढत झाली आहे. मागच्यावेळी महायुतीला 41 जागा मिळाल्या. त्यात नवनीत राणा त्यांच्यासोबत गेल्याने ही संख्या 42 झाली होती. त्यामुळे यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीला बरोबरीने जागा मिळतील असं दिसतंय. नेमक्या जागा किती मिळतील हे सांगणं शक्य नाही. साधारणपणे 22 ते 24 जागा महायुतीच्या असतील. तर 24 ते 26 किंवा त्या आसपासच्या जागा महाविकास आघाडीला मिळेल. 24 पेक्षा थोड्या कमी जागा महायुतीला मिळतील. 24 पेक्षा थोड्या अधिक जागा महाविकास आघाडीला मिळेल, असं श्रीमंत माने म्हणाले.

ठाकरेंचा प्रचार आक्रमक

एकनाथ शिंदेंनी जागा वाटपात त्यांना हव्या त्या जागा त्यांच्या पदरात पाडून घेतल्या. त्यांचा प्रचार चांगला झाला. प्रचारातील त्यांची सक्रियता चांगली होती. पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार यांची सक्रियता चांगली होती. महाविकास आघाडीतील दोन पक्ष फुटल्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबतची सहानुभूती होती. महाविकास आघाडीतील सर्वात मोठी बाजू म्हणजे उद्धव ठाकरे यांचा आक्रमक प्रचार होता. पूर्व विदर्भात उद्धव ठाकरे यांचा प्रचार कमी झाला. ज्या ठिकाणी प्रचार आक्रमक झाला तिथले निकाल आणि ज्या ठिकाणी ठाकरेंचा प्रचार कमी झाला तिथले निकाल यावर बरंचसं अवलंबून आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

400 पार नाहीच

राज्य घटनेच्या मुद्द्यावर दलित आणि मुस्लिम मते कुठे जातात यावर बराचसा निकाल अवलंबून आहे. भाजप 400 पार होणार नाही. पण बहुमताच्या दृष्टीने ही स्पर्धा असेल. एनडीएला बहुमत मिळेल. पण भाजपला एकट्याला बहुमत मिळेल का हे शेवटच्या दोन टप्प्यातील मतदान झाल्यावर कळेल, असंही त्यांनी सांगितलं.

वंचितला मते पडतील, पण…

यावेळी त्यांनी वंचित आघाडीचा फारसा प्रभाव पडणार नसल्याचं सांगितलं. वंचित महाविकास आघाडीला डॅंमेज करताना दिसत नाही. वंचित मते घेईल. पण मोठं डॅमेज होणार नाही. 2019च्या निवडणुकीत त्यांनी 9 मतदारसंघात मोठी मते घेतली होती. यावेळी अकोला, हिंगोली परभणीच्या भागात थोडा फरक पडेल. वंचितला मते मिळतील. भिवंडी, शिर्डीतही ते मते घेतील. मोजक्याच मतदारसंघात त्यांचा प्रभाव पडेल. पण राज्यावर प्रभाव पडेल असं वाटत नाही, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us