
Sharad Pawar-Ajit Pawar: राज्याचे लाडके नेते अजितदादांच्या अकाली निधनाने राज्याला धक्का बसला. अनेक जण अजूनही त्यातून सावरलेले नाहीत. त्यातच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयीच्या चर्चांना सध्या ऊत आला आहे. अजितदादा 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनिकरणाची घोषणा करणार होते असा दावा करण्यात येत आहे. कार्यकर्ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बाजूने असले तरी प्रमुख नेत्यांची तोंडं मात्र विरुद्ध दिशेला आहेत. उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत तर या विषयावर सातत्याने तोंडसुख घेत आहेत. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे विलिनिकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. वडेट्टीवार यांच्या दाव्याने राज्यात येत्या काही दिवसात मोठा भूकंप होणार होता असे संकेत मिळत आहेत. पण अजितदादांच्या अकाली एक्झिटमुळे अनेक दावे काळाच्या पडद्याआड लोप पावले आहेत.
गुजरातच्या उद्योगपतीच्या मध्यस्थीचा दावा
राष्ट्रवादीतील विलीनिकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतीकडून मध्यस्थी करण्यात आल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. एनडीएला पाठिंबा देण्याची एक अट होती. त्यावर एकमत बाकी होतं असा दावा वडेट्टीवार यांनी केला. काही दिवसांपूर्वी एक उद्योगपती येऊन गेले. त्यांनी या विलीनिकरणासाठी समेट घडवून आणली. हे विलीनीकरण घडवून आणताना एनडीला पाठिंबा देण्याची अट घालण्यात आली. यावर अद्याप एकमत झालेलं नाही. गुजरातचे आणि देशातील एक मोठे उद्योगपती यांनी त्यासाठी मध्यस्थी केली. एनडीएला पाठिंबा देण्यावरून ही प्रक्रिया थांबल्याचे त्यांनी सांगितले.
विलीनिकरणावरून दावे-प्रतिदावे
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनिकरणावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तर शपथेवर या चर्चा झाल्याचा दावा केला आहे. शरद पवार गटातील जयंत पाटील यांनी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनिकरणासाठी अजितदादा आग्रही होते. आपल्या घरी सुद्धा याविषयीची बैठक झाली होती. तर त्यांनी 12 फेब्रुवारी रोजी याविषयीची अधिकृत घोषणा ही होणार होती असे त्यांनी स्पष्ट केले. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते यांनी याविषयी कानावर हात ठेवले आहे. आपल्याला दादांनी याविषयीची कोणतीही कल्पनाच दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे याविषयावर संभ्रम कायम आहे.
तर उद्योगपती गौतम अदानी हे काही दिवसांपूर्वी बारामती येथे आले होते. त्यांनी बारामती इथे AI सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्धघाटन केले. त्यावेळी गौतम अदानी हे शरद पवार यांच्या पाया पडले. तर यावेळी शरद पवार आणि अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह पवार कुटुंबिय, राष्ट्रवादीचे नेते हजर होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी जवळ आल्याचे मानले जात होते. तर आता विजय वडेट्टीवार यांनी नेमका तोच सूर पकडला आहे.