जिसकी जितनी संख्या भारी… विजय वडेट्टीवारांचा एल्गार… ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी बाहेर काढले ते अस्त्र
Vijay Vadettiwar on OBC Census: ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एल्गार पुकारला आहे. त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. पूर्व विदर्भात लवकरच मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

Vijay Vadettiwar on OBC Census: देशात राष्ट्रीय जनगणनेचे काम सुरू झाले आहे. पण त्यात ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याने ओबीसी नेते नाराज झाले आहे. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आता ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी एल्गार पुकारला आहे. त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ओबीसींच्या जनगणनेसंदर्भात सरकार कशामुळे घाबरत आहे, असा सवालही त्यांनी केला. पूर्व विदर्भात लवकरच मोठे आंदोलन करण्याचा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला.
जनगणनेवर बहिष्काराचे अस्त्र
भंडारा जिल्ह्यात जनगणनेवर बहिष्कार टाकण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मोदी सरकारला आम्ही निर्वाणीचा इशारा दिला आहे. पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे ओबीसींचा स्वतंत्र रकाना ठेवून जनणगणना करण्यात यायला हवी. ओबीसींशी सरकारने बेईमानी केली आहे. आमच्याशी विश्वासघात केला, त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. सरकारला ओबीसीची स्वतंत्र जनगणना करायची नाही, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
जिसकी जितनी संख्या…
ओबीसी जनगणना न करण्यामागे त्यांची काय भूमिका आहे हे त्यांनाच माहिती. पण आमची भूमिका ओबीसी जनगणना करणे ही आहे. सरकारला कदाचित जनगणनेची भीती वाटत असेल की ओबीसींची संख्या पुढे आली की, त्यांच्या हक्काचं, त्यांना दावं लागेल. सध्या देशाला या सरकारने कंगालच करून सोडलेले आहे. आमचं मत इतकंच आहे की, आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात असेल अथवा ओसीबींसाठी असलेल्या सवलतीत , शिष्यवृत्तीत, सगळ्यात गोष्टीत आम्हाला आमचा वाटा मिळावा. त्यासाठी जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी हीच आमची भूमिका आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
तर जेलभरो आंदोलन करणार
जनगणनेत सहकार्य केले नाही तर गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याच्या प्रश्नावर विजय वडेट्टीवार एकदम भडकले. आम्ही सरकारचे काही बांधील आहोत का? असा सवाल त्यांनी केला. सरकारने ओबीसी रकाना घ्यावा आम्ही त्यांना सहकार्य करू. ते कसे गुन्हे दाखल करता तेच आम्ही बघतो. आम्ही सर्व ओबीसी मिळून जेलभरो आंदोलन करू. त्याचीही तयारी आम्ही केलेली आहे, असा इशारा वडेट्टीवार यांनी केला. आमच्या हक्काचं देण्याची तुमची नियत नसेल आणि उलट आमच्यावर गुन्हे दाखल करणार असाल, तर तुरुंगात जाण्याची आमची भूमिका आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
नेहरूंची बरोबरी थोडीच होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहरूंच्या काळाची बरोबरी करतील. पण ते नेहरूंची बरोबरीच थोडीच करणार. नेहरूंच्या काळात ज्या परिस्थितीतून देश स्वतंत्र झाला. तर आजची देशाची परिस्थिती पाहिली, सर्व असतानाही देश कशा संकटात आहे. कशा पद्धतीने देशातील जनता हैराण आहे. त्यामुळे 12 वर्षे पूर्ण जरी झाले तरी देशाचे 12 वाजलेत हे लोकांच्या लक्षात आलेले आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे.