सहकार्याचा मार्ग नॅरोगेज न राहता ब्रॉडगेज असावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नितीन गडकरींना साद

| Updated on: Jul 31, 2021 | 2:30 PM

नागपूर येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. (we should work together for maharashtra says, cm uddhav thackeray)

सहकार्याचा मार्ग नॅरोगेज न राहता ब्रॉडगेज असावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नितीन गडकरींना साद
cm uddhav thackeray
Follow us on

नागपूर: नागपूर येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे सहकार्याने काम करण्याची भावना व्यक्त केली. तसेच सहकार्याचा हा मार्ग नॅरोगेज न राहता ब्रॉडगेज असावा, अशी सादच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना घातली. (we should work together for maharashtra says, cm uddhav thackeray)

नवीन रेल्वे उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्याला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागभिडच्या नॅरोगेचं ब्रॉडगेज करण्याबाबतची शासनाची भूमिका मांडली. ही भूमिका मांडत असताना मुख्यमंत्र्यांनी केंद्र आणि राज्याने सहकार्याने काम करण्याची भूमिकाही विशद केली. केंद्र आणि राज्य सरकार नेहमीच एकत्र येऊन कोणतेही राजकीय अडथळे न येऊ देता विकासकामे करत आले आहेत. ही आपली संस्कृती आहे. ती तशीच जपत जाऊ, हा आपला सहकार्याचा मार्ग आहे. तो कुठेही नॅरोगेज न राहता तो सदैव ब्रॉडगेज असावा, असं मुख्यमंत्री म्हणाले.

एकदाच काय ते करू, पण व्यवस्थित करू

राज्यात अतिवृष्टी, वादळ, महापूर आदी संकटे वारंवार येत आहेत. त्यामुळे आपल्याला तात्कालिक काम करून चालणार नाही. काही ठिकाणी परमनंट काम करावे लागतील. पुढचे कित्येक वर्षे कितीही पाऊस पडला तरी त्याला काही बाधा येणार नाही, असं काम केलं पाहिजे. नागभिडचा नॅरोग्रेजचं ब्रॉडगेज करण्याचा प्रस्ताव माझ्याकडे आला होता. तेव्हा शक्यतोवर जिथे जंगल असेल तिथे उन्नत मार्ग केला पाहिजे, अशी सूचना मी केली होती. या ठिकाणी जंगलही तसंच राहील. ते शक्य आहे. पर्यावरणाला बाधा येऊ न देता उन्नत पद्धतीने केलं पाहिजे, असं सांगतानाच काही लोक म्हणतील तुम्हाला बोलायला काय जातं? त्यावर खर्च किती येईल. खर्च जरूर येईल. पण आता आपत्ती आणि त्यातून सावरण्याचा जो खर्च दरवर्षी येतो तो कित्येक पटीत आहे. म्हणून एकदाच काय ते करू, व्यवस्थित करू. म्हणजे पुढे अशी संकटं येणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तुमच्या सर्व टेक्नॉलॉजीची मदत हवी

यावेळी त्यांनी गडकरींकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. नितीनजी, मला तुमची गरज आहे. सध्या जगभर कोरोनाचा संकट आहे. आपला देशही सुटला नाही. आता नैसर्गिक आपत्ती येत आहे. सुरुवातच तौक्ते वादळाने झाली. पूर अतिवृष्टी हे संकट आलं आहे. हे वारंवार घडत आहे. कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते, पूर यातून आपण नक्कीच सावरू. तेवढा महाराष्ट्र समर्थ आहे. तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणत आहात. कितीही पाऊस पडला तरी पुढची काही वर्षे त्यावर खड्डा पडणार नाही, असं तुम्ही म्हणाला होतात. आता खड्ड्यांच्या पलिकडे जाऊन रस्तेच्या रस्ते खचत आहेत. तिथे तुमची मदत हवी. या वर्षीचं संकट निभावून नेऊ. पण पुढच्या वर्षी संकट आलं तर…? यावर्षीचा पावसाळा संपला नाही. अजून दोन तीन महिने आहेत. आपले रस्ते घाट खचले, पूल वाहून गेले. मला तुमच्या सर्व टेक्नॉलॉजीची मदत हवी आहे. महाराष्ट्राला गरज आहे. जेणेकरून आता जे काही काम करू एक तर पर्यावरणाला सांभाळून करू. जे काम केलं त्यात मजबुतीकरण कसं करू याची मदत तुमच्याकडून लागेल, असं त्यांनी सांगितलं.

 

नितीनजी, मला तुमचा अभिमान वाटतो

यावेळी मुख्यमंत्र्यांनी गडकरींचं मुक्तकंठाने कौतुक केलं. नितीनजी तुमचं काय वर्णन करू? कारण तुमची एक वेगळी ओळख आहे. ती नेमक्या शब्दात मांडणं दिवसागणिक कठिण होत चाललं आहे. असं कर्तृत्व आपण दिवसागणिक सिद्ध करत चालला आहेत. मी तुमचं उगाचच कौतुक करत नाही. मला ते दिवस आठवतात जेव्हा युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं. मुंबई आणि पुणे ही दोन ही दोन शहरं… आता तर तुम्ही त्याचं अंतर आणखी कमी करत आहात. शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला बोलावं. मला पुणे-मुंबईचा रस्ता सरळ पाहिजे अशी इच्छा तुमच्याकडे व्यक्त केली. या दोन्ही शहरात ये-जा करण्यासाठी पाच पाच तास लागायचे. रस्ते कोंडी व्हायची. हा प्रवास दोन तासावर आला पाहिजे, असं शिवसेनाप्रमुख तुम्हाला म्हणाले होते. एक स्वप्न पाहणं त्यात एक धाडस लागतं आणि स्वप्न प्रत्यक्षात आणणं हे त्यापेक्षाही मोठं कर्मकठिण काम करायला अधिक मोठं धाडस लागतं. तुमच्या जागी दुसरा एखादा असता तर, जरा बघतो मी, कसं काय शक्य आहे काय होणार… कसं होणार… पण तुम्ही तात्काळ म्हणाला मी करतो आणि करून दाखवलं. आता तीच एक तुमची ओळख तुम्ही देशभरात आपल्या कर्तृत्वाने निर्माण करत आहात. त्याबद्दल मला तुमचा अभिमान आहे, असे गौरवौद्गारही त्यांनी काढले. (we should work together for maharashtra says, cm uddhav thackeray)

 

संबंधित बातम्या:

MahaRERA: घर खरेदी करताना सावधान, महाराष्ट्रातील 644 गृहनिर्माण प्रकल्प ‘महारेरा’च्या ब्लॅक लिस्टमध्ये

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा, बीड प्रशासन खडबडून जागं, बीडमध्ये एन्ट्री करायचीय? मग आधी अँटिजेन टेस्ट नंतरच एन्ट्री!

कुठेही जा, तुमची ओळखही शिवसैनिक म्हणूनच; संजय राऊतांचा राणेंना टोला

(we should work together for maharashtra says, cm uddhav thackeray)