‘उद्धव ठाकरे महाफडतूस, ती खुर्ची सिंहासन नव्हे… टेकण्यासाठी सगळीकडे नेतात’, नारायण राणे यांची आगपाखड
उद्धव ठाकरे हेच महाफडतूस आहेत. त्यांनी अडीच वर्ष स्वतः काही काम केलेलं नाही, केवळ खुर्चीत बसून राहिले, परत बोलला तर त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आज जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे हेच खरे महाफडतूस आहेत. देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) बोलण्याची त्यांची लायकी नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली. पुन्हा जर भाजप नेत्यांवर बोलण्याची हिंमत केली तर आम्ही सोडणार नाही, अशी धमकीवजा इशाराच नारायण राणे यांनी दिलाय. ठाकरे गटाचे नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलतायत, त्यांची हे बोलण्याची लायकी नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
ते सिंहासन नव्हे विशेष खुर्ची
महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांमध्ये एक गोष्ट प्रकार्षाने समोर आली. या आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. अजित पवार यांनीही याविषयी वक्तव्य केलं. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेली विशेष खुर्ची सध्या चर्चेत आहे. सिंहासनासारख्या दिसणाऱ्या या खुर्चीवरून नारायण राणे यांनी तुफान खिल्ली उडवली. ते सिंहासन नाहीये. ती त्यांना टेकण्यासाठीची व्यवस्था आहे. त्यांना साध्या खुर्चीवर बसता येत नाही. काहीतरी टेकण लागतं. त्यामुळे जिथं जाईल तिथं ही खुर्ची घेऊन जावी लागते. पण लोकांनी त्याला सिंहासन म्हटलं, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे.
‘शिव्या देण्याची लायकी नाही’
देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांची त्यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही. ते स्वतःच महाफडतूस आहेत. त्यांनी अडीच वर्ष स्वतः काही काम केलेलं नाही, केवळ खुर्चीत बसून राहिले, परत बोलला तर त्याचे परिणाम वाईट होतील. फडतूस कसा असतो, त्याचं प्रात्यक्षिक तुला कळेल असा इशारा नारायण राणे यांनी दिला. पंतप्रधानांवरील टीकेला प्रत्युत्तर देताना नारायण राणे म्हणाले, ‘ शिव्या द्यायचं काम उद्धव ठाकरे करू शकतो. आमचे पंतप्रधान जगाच्या पाठिवर अतिशय नावलौकिक मिळवलेले व्यक्ती आहेत. लोकप्रिय व्यक्ती आहेत. २०१४ साली सत्तेत आले तेव्हा भारत जगाच्या अर्थव्यवस्थेत १० व्या क्रमांकावर होता. आता तो पाचव्या क्रमांकावर आहे. २०३० साली तो तिसऱ्या क्रमांकावर असेल, असे मोदींनी सांगितलंय.
