Nashik | नाशिकच्या मासिक पाळी प्रकरणाला धक्कादायक वळण, पीडित मुलीने बनाव केल्याचा चौकशी अहवाल

| Updated on: Aug 02, 2022 | 10:48 AM

आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणी यांनी सदर प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मीना यांनी शाळेचा हजेरी पट तपासला असता, ज्या दिवशी वृक्षारोपण झाले, त्याच दिवशी म्हणजे 14 जुलै रोजी विद्यार्थिनी शाळेत गैरहजर होती, असे आढळून आले.

Nashik | नाशिकच्या मासिक पाळी प्रकरणाला धक्कादायक वळण, पीडित मुलीने बनाव केल्याचा चौकशी अहवाल
तक्रारदार विद्यार्थिनी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिकः नाशिकमधील मासिक पाळी (Nashik Menstruation) प्रकरणानं धक्कादायक वळण घेतल्याचं उघड झालं आहे. मासिक पाळी सुरु असल्यामुळे एका विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यास शिक्षकाने (Nashik Teacher) मनाई केली होती. सदर घटनेचा तीव्र निषेध करत विद्यार्थिनीने (Nashik Girl) आधी पालकांकडे आणि नंतर आयुक्तांकडे याविषयी तक्रार दाखल केली होती. मुलीच्या तक्रारीनंतर या विषयी राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही शिक्षकांचे असे विचार असल्यावरून संताप व्यक्त केला गेला. याविषयी आदिवासी आयुक्तांमार्फत चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशीनंतर समितीने सादर केलेल्या अहवालात धक्कादायक बाब उघड झाली आहे. मुलीने केलेली ही तक्रार बनावट असल्याचे अहवालाअंती समोर आले आहं.

काय आहे नेमकं प्रकरण?

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव शासकीय आश्रमशाळेत गेल्या आठवड्यात विद्यार्थिनीला मासिक पाळीत वृक्षारोपण करण्यास मनाई करण्यात आली होती. राज्यभरात हा विषय चर्चेचा ठरला होता. मात्र प्रत्यक्षात संबंधित विद्यार्थिनीबाबत असा काही प्रकार घडलाच नसल्याचं चौकशीत आढळून आलं आहे. शाळेत वृक्षारोपण झाले त्या दिवशी संबंधित विद्यार्थिनी गैरहजर असल्याचं समितीने केलेल्या चौकशीत आढळून आलं. आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी वर्षा मीना आणि बालहक्क संरक्षण आयोग सायली पालखेडकर यांचा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे संबंधित शिक्षक निर्दोष असल्याचा अहवाल चौकशी अधिकारी तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांनी अप्पर आयुक्तांकडे सादर केला आहे. दोन महिन्यांपासून ही विद्यार्थिनी सतत गैरहजर होती. या कारवाईच्या भीतीतून विद्यार्थिनीने आरोप करताना सदर प्रकरणाचा बनाव केला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अहवाल काय सांगतोय?

आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणी यांनी सदर प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मीना यांनी शाळेचा हजेरी पट तपासला असता, ज्या दिवशी वृक्षारोपण झाले, त्याच दिवशी म्हणजे 14 जुलै रोजी विद्यार्थिनी शाळेत गैरहजर होती, असे आढळून आले. तसेच ती विद्यार्थिनी जून महिन्यात चार दिवस तर जुलै महिन्यात फक्त तीन दिवस शाळेत उपस्थित होती, असे चौकशीतून उघड झाले आहे. सदर विद्यार्थिनी आदिवासी विभागात काम करणाऱ्या एका राजकीय पक्ष संघटनेची सदस्य आहे. सतत गैरहजर असल्यामुळे तिला बारावीचे वर्ष वाया जाण्याची भीती होती. विज्ञान शाखेत शिकत असूनही ती गैरहजर असल्याने वर्गशिक्षकाने तिला जाब विचारला होता. तसेच यापुढे शाळेत बसू न देण्याचाही इशारा दिला होता. त्यामुळे विद्यार्थिनीने कारवाईच्या भीतीपोटी मासिक पाळीमुळे आपल्याला वृक्षारोपणापासून रोखल्याचा बनाव केला असण्याची शक्यता चौकशी अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.