आठ महिन्यांची चिमुकली, मध्यरात्री अंथरुणातून गायब, नेमकं काय घडलं?
नाशिकमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मध्यरात्री आई-वडिलांसोबत झोपलेली मुलगी अचानक गायब झाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आठ महिन्यांची चिमुकली मध्यरात्री घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नांदगाव तालुक्यातील मन्याड चौकी येथे १७ तारखेच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनाक्रमाने चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. चिमुकली मध्यरात्री कुठे गेली? याचा तपास पोलीस करत आहेत.
मध्यरात्री सुमारे १२ वाजता चिमुकली आपल्या आई-वडिलांच्या अंथरुणातून गायब झाली आहे. घरात सर्वजण झोपलेले असताना चिमुरडी अचानक गायब झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला. सकाळ होताच ही बाब समोर आली आणि शोध मोहीम सुरू झाली. या प्रकरणी चिमुकलीच्या वडिलांनी नांदगाव पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दाखल केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस यंत्रणा तसेच परिसरातील नागरिकांनी मिळून चिमुकलीचा शोध सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून शोध मोहिम करत आहेत. परिसरातील घरे, शेतजमिनी, जंगलाचे भाग आणि आसपासच्या ठिकाणी शोध सुरू असून अद्याप कोणतीही ठोस माग काढता आलेली नाही. मात्र, आई-वडिलांचा एका व्यक्तीवर संशय होता. या वक्तीने सर्व आरोपांमुळे स्वत:चे आयुष्य संपवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतरही या प्रकरणी अद्याप सत्य समोर आलेले नाही.
केवळ आठ महिन्यांची एवढी छोटी चिमुकली बेपत्ता झाल्याने विविध प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत. इतक्या छोट्या बाळाला कोण आणि कसे घेऊन जाईल, याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. काहींना यामागे अपहरणाची शक्यता वाटत असताना, काही जण अपघाती गायब होण्याचीही शक्यता व्यक्त करत आहेत. मात्र पोलिसांनी सर्वच अंगांनी चौकशी सुरू ठेवल्याचे सांगितले आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही संशयास्पद माहिती असल्यास तातडीने कळवावी. सध्या शोध मोहीम जोरात सुरू असून चिमुकली लवकरात लवकर सापडावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे. मात्र, अद्याप कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही.
