नाशिकमध्ये 48 हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान; मदतीसाठी प्रस्ताव पाठवला 38 कोटींचा

| Updated on: Oct 02, 2021 | 1:08 PM

नाशिक जिल्ह्यात गुलाब वादळाने हाहाकार माजवला असून, फक्त नांदगाव आणि मालेगावमध्ये तब्बल 48 हजार 275 हेक्टरचे नुकसान झाले आहे, तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाने 38 कोटी 20 लाख 22 हजार रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवला आहे.

नाशिकमध्ये 48 हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान; मदतीसाठी प्रस्ताव पाठवला 38 कोटींचा
नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.
Follow us on

नाशिकः नाशिक जिल्ह्यात गुलाब वादळाने हाहाकार माजवला असून, फक्त नांदगाव आणि मालेगावमध्ये तब्बल 48 हजार 275 हेक्टरचे नुकसान झाले आहे, तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाने 38 कोटी 20 लाख 22 हजार रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवला आहे.

जिल्ह्यात सात आणि आठ सप्टेंबर रोजी आलेल्या गुलाब वादळ्याच्या पावसाने नांदगाव आणि मालेगावला अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे जिरायती भागावरील 40449.64 हेक्टर क्षेत्रावरील पीक उद्धवस्त झाले. बागायती जमिनीवरील 7521.83 हेक्टर पीक उद्धवस्त झाले. वार्षिक फळपिके 12.22 हेक्टरवर उद्धवस्त झाली. बहुवार्षिक फळपिके 291.93 हेक्टर उद्धवस्त झाली. असे एकूण 48275.62 हेक्टरवरील पीक अतिवृष्टीने उद्धवस्त झाले आहे. अजूनही अनेक भागात पावसाची हजेरी सुरू आहे. नांदगाव आणि मनमाडला दोनदा अतिवृष्टीचा सामना करावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांचे कबरडे मोडले आहे. हे पाहता तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

7 हजार कोंबड्या मृत्यूमुखी

नांदगाव आणि मालेगावमध्ये भयानक अतिवृष्टी झाली आहे. पावसामुळे झालेला हाहाकार पाहून कुणाचेही काळीज पिळवटून निघेल इतके नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पीके तर आडवी झालीच आहेत, सोबतच 7 हजार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या असून, १०४ घरांची पडझड झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक पंचनाम्यात उघड झाले आहे. या विनाशकारी पावसाचा तब्बल 152 गावांमधील 69 हजार 269 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पावसाने फळबागा, मका, बाजरी, कापूर, सोयाबीन, भुईमुगाचे अतोनात नुकसान झाले आहे.

कांद्याचे पीक आडवे

नांदगाव-मालेगावमध्ये दोन दिवस झालेल्या पावसाने कांद्याची उभी पिके आडवी झाली आहेत. फळबागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष व डाळिंब बागा उद्धवस्त झाल्या आहेत. अनेक घरांवरील वाऱ्यामुळे पत्रे उडाले आहेत. अनेक घरे पडली आहेत. आता प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून, शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे.

बारा वर्षांत पहिल्यांदा इतका पाऊस

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून ओळखरा जातो. इथे बारा वर्षांत पहिल्यांदा इतका पाऊस पडला आहे. 12 तासांमध्ये 121 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले असून, खरीप हंगाम हातचा गेला आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यानंतर नवरात्र व दिवाळी. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांवर निसर्गाने पुन्हा एकदा वार केला आहे.

नद्यांना आला पूर

नांदगाव आणि मनमाडला परिसरात गेले दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली होती. इथे आतापर्यंत तब्बल 123 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे . शहरातून वाहणाऱ्या लेंडी आणि शाकंभरी नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी शहरातील सखल भागातील घरे आणि दुकानांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझडही झाली आहे.

इतर बातम्याः

नाशिकमध्ये मंगळवारी गोळाबाराची प्रात्यक्षिके; प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास नागरिकांना मनाई

भुजबळांच्या नावे पुन्हा खणखणले धमकीचे फोन; जिल्हाधिकाऱ्यांच्याही नावाचा वापर

(Damage to crops on 48 thousand hectares due to heavy rains in Nashik district, 38 crore proposal sent for help)