नाट लागलं… शिंदे गटात मोठा अंतर्गत वाद, धुसफूस वाढली; थेट आमदारानेच दिली खळबळजनक कबुली
शिंदे गटात अंतर्गत गटबाजी व वादाने खळबळ उडाल्याची कबुली आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे. नंदूरबार शिवसेनेत गटबाजी वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे गट सर्व काही अलबेल असल्याचे दाखवत असला तरी, प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे आहे. मुख्यमंत्र्यांनी या अंतर्गत वादावर तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिंदे गटात सर्व काही अलबेल असल्याचं चित्र असलं तरी प्रत्यक्षात मात्र चित्र काही वेगळंच असल्याचं समोर आलं आहे. शिंदे गटात अंतर्गत मोठी गटबाजी असल्याचं उघड झालं आहे. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तशी कबुलीच दिली आहे. नंदूरबार शिवसेनेत अंतर्गत वाद असल्याचा दावा चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील पक्षातील गटबाजी जाहीरपणे उघड झाल्यानंतर पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता गटबाजी कशी थोपवतात याकडे सर्वांचं लक्ष लागंल आहे.
शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मीडियाशी संवाद साधताना या गटबाजीवर भाष्य केलं आहे. दुर्दैवाने शिवसेना पक्षाला गटबाजीची नाट लागली आहे, अशी खंत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षात खूप गटबाजी आहे. पक्षात मोठ्या प्रमाणावर अंतर्गत वाद आहेत, अशी कबुलीही चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.
संपर्कप्रमुखांनी दम द्यावा
तसं पाहिलं तर तळोदा पाव किलोच आहे. पण तिथेही दोन गट आहेत. दोन दुकाने ठेवून आपला पक्ष एवढाच असल्याचं दाखवलं जात आहे. आपण सगळे मिळून पाव किलो असलो तरी लोकांची सेवा करत आहोत, असे रघुवंशी यांनी म्हटलंय. संपर्कप्रमुखांनी सर्वांना बोलावून दम देत आपापसांतील मतभेद मिटवले पाहिजेत. पक्षाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
नंदूरबारमध्ये दुष्काळ जाहीर करा
दरम्यान, आठ दिवसांपूर्वीच चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदूरबार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केलं होतं. नंदूरबारमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली होती. नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, दुष्काळसदृश्य परिस्थिती न जाहीर करता जिल्हा थेट दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी रघुवंशी यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती.
सध्या जिल्ह्यात तुरळक स्वरूपात पाऊस होत असून, फवारणी केल्याप्रमाणेच पाऊस पडत आहे. आगामी 8 ते 10 दिवस पाऊस न झाल्यास खरीप पिके करपू लागण्याची शक्यता आहे. तसेच जमिनीत पाणी मुरेल, एवढा पाऊस झालेला नसल्याने शासनाने या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रघुवंशी यांनी केली आहे.
