मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रॅव्हल्सने कारला नेले फरफटत; तिहेरी अपघातात 1 ठार, 2 गंभीर

| Updated on: Mar 26, 2022 | 11:10 AM

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अपघात वाढले आहेत. हे पाहता वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे. वेगाची नशा जीवनावर भारी पडते. हे ध्यानात घेऊनच वाहने चालवावीत, असे आवाहन वाहतूक पोलीस आणि पोलिसांकडून वारंवार करण्यात येते. मात्र, वाहनधारक इकडे लक्ष देत नाहीत.

मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रॅव्हल्सने कारला नेले फरफटत; तिहेरी अपघातात 1 ठार, 2 गंभीर
accident
Image Credit source: tv9
Follow us on

मालेगावः मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) झालेल्या भीषण तिहेरी अपघातामध्ये (triple accident) एक जण जागीच ठार झाला असून, दोघे गंभीर जखमी झालेत. ट्रॅव्हल्स, आयशर आणि कारमध्ये ही दुर्घटना घडली. नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या मालेगावच्या सौंदाणे गावाजवळ हा अपघात झाला. घटनेतील जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या अपघाताची सविस्तर माहिती अशी की, मालेगावच्या सौंदाणे गावाजळ एका ट्रॅव्हल्सने कारला धडक दिली. चालकाला वेगावर नियंत्रण करता आले नाही. त्यामुळे शंभर फुटापेक्षा जास्त ट्रॅव्हल्ससोबत कारही फरफटत गेली. या भीषण अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. अपघात इतका भीषण होता की, रस्त्यावरचे चित्र पाहणे असह्य होते. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी जखमींच्या मदतीसाठी सहकार्य केले.

गायीही झाल्या जखमी

अपघातामध्ये ट्रॅव्हल्सने कारला फरफटत नेले. मात्र, यात एक आयशर गाडी आली. तिलाही या वाहनांची धडक बसली. या आयशरमधून गायींची वाहतूक सुरू होती. त्यात अनेक गायी जखमी झाल्याचे समजते. त्यातील काही जखमी गायींना मुंगसे येथील गोशाळेत ठेवण्यात आले आहे. या वेळी एका द्राक्षाच्या पिकअपचे नुकसान झाल्याची माहितीही समोर आली आहे. सध्या अपघातातील जखमी आणि गायींवर उपचार सुरू आहेत.

अपघातांचे प्रमाण वाढले

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अपघात वाढले आहेत. हे पाहता वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे. वेगाची नशा जीवनावर भारी पडते. हे ध्यानात घेऊनच वाहने चालवावीत, असे आवाहन वाहतूक पोलीस आणि पोलिसांकडून वारंवार करण्यात येते. मात्र, वाहनधारक इकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे अपघातातील मृतांचे प्रमाण वाढले आहे.

दुचाकीस्वारांचे अपघात सत्र

नाशिकमध्ये दुचाकीस्वारांचेही अपघात सत्र थांबताना दिसत नाही. हे मृत्यू थांबवण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना ताब्यात घेऊन त्यांना केंद्रावर नेत त्यांचे समुपदेशन करण्याची मोहीम सुरू केली. कठोर हेल्मेटसक्ती केली. मात्र, त्यानंतरही कोणी हेल्मेट घालत नाही. अपघात सुरूच आहे. त्यात अनेकांचे मृत्यू होत आहेत.

इतर बातम्याः

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?