सप्तश्रृंगीकडे जाणाऱ्या भाविकांवर मालेगावमध्ये दगडफेक; हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन, भुसेंकडून परिस्थिती नियंत्रणात
कोरोनाच्या दोन वर्षांच्या कडकडीत लॉकडाऊननंतर यंदा प्रथमच सप्तश्रृंगीगडाव चैत्रोत्सव होतोय. यात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातून किमान पाच लाख भाविक हजेरी लावतील अशी शक्यता आहे.
मालेगावः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या वणीच्या (Wani) सप्तश्रृंगीगडावर (Saptashrungi) सुरू असलेल्या चैत्रोत्सवासाठी शिरपूरहून पायी जाणाऱ्या भाविकांवर मालेगावमध्ये रात्री दगडफेक केल्याची घटना घडली. त्यामुळे आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी छावणी पोलीस ठाण्यासमोरच रात्रीच धरणे आंदोलन सुरू केले. शेवटी कृषिमंत्री दादा भुसे यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी भाविकांच्या सुरक्षेत वाढ केली असून, समाजकंटकांचा शोध घेण्यात येत आहेत. सप्तश्रृंगीगडावर सुरू असलेल्या चैत्रोत्सवासाठी दरवर्षी लाखो भाविक हजेरी लावतात. कोरोनाच्या दोन वर्षांतील खंडानंतर यंदा हा उत्सव होतोय. सोमवारी रात्री जळगाव, शिरपूर, धुळे आणि इतर राज्यातील भाविक गडावर निघाले होते. मात्र, रात्री आठच्या सुमारास मालेगावातल्या जुना मुंबई – आग्रा महामार्गावर या भाविकांवर आणि डीजेवर तुफान दगडफेक झाली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
पोलीस बंदोबस्तात वाढ
जवळपास पंधरा समाजकंटकांनी हे कृत्य केल्याची प्रतिक्रिया भाविकांनी दिल्यात. या घटनेत एका भाविकाच्या मोबाइलची तोडफोड झाली, तर एकाचा मोबाइल लंपास केला. त्यामुळे परिसरात आणि भाविकांत तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी छावणी पोलीस ठाणे गाठून तिथेच आंदोलन सुरू केले.
मंत्री भुसेंची धाव
भाविकांवर दगडफेकीची घटना कळताच कृषिमंत्री दादा भुसे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कृषिमंत्र्यांना पाच-सहा दिवस पोलीस बंदोबस्तात वाढ करण्याची मागणी अपर पोलीस अधीक्षकांकडे केली. त्यांनी पोलीस आणि महापालिका आयुक्तांसोबत चर्चा केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
लाखो भाविकांची हजेरी
कोरोनाच्या दोन वर्षांच्या कडकडीत लॉकडाऊननंतर यंदा प्रथमच हा उत्सव होतोय. यात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातून किमान पाच लाख भाविक हजेरी लावतील अशी शक्यता आहे. या उत्सवासाठी खान्देशातून आलेल्या शेकड्या पालख्या गडाकडे रवाना झाल्या आहेत. गड परिसरातील वातावरण निसर्गरम्य आहे. त्यामुळे कुणालाही इथल्या स्थळाची भुरळ पडते. लाखो भाविकांचे सप्तश्रृंगी माता कुलदैवत आहे. प्रभू रामचंद्रापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांनी या स्थळाला भेट दिल्याचे म्हटले जाते. इतर बातम्याः