रक्षाबंधनच्या दिवशी सुप्रिया सुळेंचं ‘लाडकी बहीण’वर भाष्य; अजितदादांना भेटणार?

Supriya Sule and Ajit Pawar Rakshabandhan : आज रक्षाबंधन आहे. या खास दिवशी सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या 'लाडकी बहीण योजने' वर भाष्य केलं आहे. अजित पवारांना आज भेटणार?, यावर सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. तसंच सरकारवर त्यांनी निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर...

रक्षाबंधनच्या दिवशी सुप्रिया सुळेंचं लाडकी बहीणवर भाष्य; अजितदादांना भेटणार?
अजित पवार, सुप्रिया सुळे
Image Credit source: Facebook
आयेशा सय्यद | Updated on: Aug 19, 2024 | 10:31 AM

आज रक्षाबंधन… बहिण- भावाच्या प्रेमाचा दिवस… आज बहिणी भावांना राखी बांधतात आणि भाऊ बहिणीला तिच्या रक्षणाचं वचन देतो. आजचा हा खास दिवस बहिण- भाऊ भेटून, कुटुंबासोबत एकत्र साजरा करतात. राज्याच्या राजकारणातील बहिण भावाची जोडी म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे… अजित पवार सध्या महायुतीत आहेत. तर सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीत आहेत. अशात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हे बहिण- भाऊ रक्षाबंधन साजरं करणार का? याची महाराष्ट्रभर चर्चा होत आहे.

अजित पवार- सुप्रिया सुळे भेटणार?

अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सध्या सुरु आहे. आज या यात्रेनिमित्त अजित पवार मुंबईत आहेत. तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचाही दौरा सुरु आहे. सुप्रिया सुळे आज नाशकात आहेत. अशात सुप्रिया सुळे यांच्याकडून राखी बांधून घेणार का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. तेव्हा मी आज मुंबईत आहे. त्यामुळे इथे ज्या- ज्या बहिणी असणार आहेत त्यांच्याकडून मी राखी बांधून घेणार आहे, असं अजित पवार म्हणाले. तर अतिथी देवो भव: असे माझ्यावर संस्कार आहेत. पवार आणि सुळे कुटुंबाने माझ्यावर हे संस्कार केलेत. त्यामुळे जर नाशकात कुणी आलं तर मी नक्की राखी बांधेन, असं त्या म्हणाल्यात. त्यामुळे आज रक्षाबंधनला सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची भेट होते का? हे पाहावं लागेल.

लाडकी बहिणवर काय म्हणाल्या?

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पुढे ढकलली आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. तुम्ही निवडणुका पुढे ढकलू शकता पण निकाल बदलू शकत नाही. हा रडीचा डाव आहे. जर लाडकी बहिण योजनेशिवाय जर हे पास होत नसतील. तर यातच यांचं अपयश आलं, असं त्या म्हणाल्या.

नारपार गिरणा योजनेवर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. केंद्र सरकारने सांगितले हे होऊ शकत नाही. 2 राज्यातील हा प्रश्न आहे. मी लक्ष घालणार नाही. समन्वय नाही ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्र आपल्या हक्काचं पाणी मागत आहे. पाण्यावरून राजकारण होऊ नये. नोकऱ्या जशा घालविला तश्या पाणी घालवू नये. हक्काचे पाणी घालवू नये. निधीचा प्रश्न नाही, गंभीर विषय आहे. संवेदनशील विषय आहे, आरोप करायचे नाही. मी न्याय मागते तीच भूमिका घ्यावी. केंद्रात आणि राज्यात वेगळं बोलतात, असं त्या म्हणाल्या.

Follow Us