Chandrasekhar Bawankule : पुढचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण हवेत? चंद्रशेखर बावनकुळेंनी या नेत्याचं नाव केलं समोर

माझं तिकीट कापलं गेलं. तेव्हा मला वाटलं नव्हतं की, मी पुन्हा आमदार होईन. राज्याचा नेता होईन. पण वरिष्ठ नेत्यांनी मला संधी दिली.

Chandrasekhar Bawankule : पुढचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण हवेत? चंद्रशेखर बावनकुळेंनी या नेत्याचं नाव केलं समोर
| Edited By: | Updated on: Sep 11, 2022 | 9:06 PM

नाशिक : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) हे आज नाशिकमध्ये होते. ते म्हणाले, मी मुख्यमंत्री झालो पाहिजे, असा उल्लेख याठिकाणी झाला. पण, या राज्याचे अष्टपैलू कर्तृत्वान व्यक्ती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे लोकनेते आहेत. त्यांनी माझ्या पाठीमागे राहून मला प्रचंड शक्ती आणि ऊर्जा दिली. त्यामुळं या राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस हेच यापुढे राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे. जात धर्म, पंथाच्या बाहेर जाऊन निष्ठावंत कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांचं नेतृत्व आपण मानलं पाहिजे. त्यांच्यामुळंच आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना मंत्रिपदं मिळालीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे उंचीवरील नेते आहेत. माझं तिकीट कापलं गेलं. तेव्हा मला वाटलं नव्हतं की, मी पुन्हा आमदार होईन. राज्याचा नेता होईन. पण वरिष्ठ नेत्यांनी मला संधी दिली. श्री संताजी मंडळ, नाशिक आणि श्री संताजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम होता.

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अंतर्गत खासदार रामदास तडस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील काही विद्यार्थ्यांचा देखील गुणगौरव करण्यात आला. नाशिक शहरातील महाकवी कालिदास कला मंदिर येथे हा सोहळा झाला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनोगत व्यक्त केले.

गजानन नाना शेलार यांना उद्देशून बावनकुळे म्हणाले, फार दिवस तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहू नका. तुमची गरज आम्हाला आहे. असं म्हणून बावनकुळे यांनी शेलार यांना भाजपात येण्याची ऑफर दिली.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी 1992 साली शाखेचा अध्यक्ष झालो. त्यावेळी सगळीकडे काँग्रेस पक्षाला स्थान होते. भाजपला अत्यंत कमी मते मिळत होती. भाजपनं मला आमदार, मंत्री तसेच आता राज्याचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी दिली.

आज भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. 2035 मध्ये जगातील सर्वात तरुण पिढी भारतात असेल. 2035 मध्ये भारत विश्वगुरू होईल. 2024 ते 2029 मध्ये देशात खूप मोठी क्रांती होईल. यापुढे ज्याच्या घरात हुशार मुले आहेत, शिक्षित मुले आहेत. ते कुटुंब सर्वाधिक श्रीमंत असेल. त्यामुळं शिक्षणावर सर्वाधिक लक्ष देणे गरजेचे आहे. महाराष्ट्र घडवायचा असेल तर 45 पेक्षा जास्त खासदार आम्हाला राज्यातून द्यावे लागतील, असंही बावनकुळे यांनी सांगितलं.