दूध दरवाढीच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक; किसान सभेच्या अजित नवलेंचा सरकारला इशारा

Ajit Navle on Milk Rate : दुधाच्या दराचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. यारून आंदोलन केलं जात आहे. नाशिकच्या वावीमध्ये दूध परिषद देखील पार पडली. दूध दरवाढीच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक झालेत. तर किसान सभेच्या अजित नवलेंनी सरकारला इशारा दिला आहे. वाचा सविस्तर...

दूध दरवाढीच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक; किसान सभेच्या अजित नवलेंचा सरकारला इशारा
अजित नवले, किसान सभा
Image Credit source: Facebook
| Updated on: Jul 02, 2024 | 7:48 PM

नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील वावी गावात भव्य दूध परिषद आणि शेतकरी मेळावा पार पडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला आहे. दूध परिषद आणि शेतकरी मेळाव्यातून सात मागण्याचे ठराव केले गेले. तसंच दूध दरवाढीच्या आंदोलनाचे राज्याभरात पडसाद पाहायला मिळाले. किसान सभेचे डॉ. अजित नवले आणि डॉ. अशोक ढवळे यांनीही दूध दराबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

अजित नवले यांची भूमिका काय?

दुधाला चांगला भाव मिळालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका अजित नवले यांनी मांडली. महाराष्ट्रात 40 रुपये दर मिळावेत यासाठी दुधाच आंदोलन सुरू आहे. आज राधाकृष्ण विखे यांनी सभागृहात दुधाला 5 रुपये अनुदान देण्याचं मान्य केलं पण ती गोष्ट आम्हाला मान्य नाही. अनुदानावर शेतकऱ्यांचा विश्वास नाही. देशभर दूध पावडर आयात केली त्यावर देशातील नेत्यांनी विरोध केला. पावडर आयातीवर देशभर आंदोलन करण्याचा निर्णय झाला. जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील. आम्ही दूध पट्ट्यातील खासदारांच्या भेटी घेत दुधाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मैदानात उतरवावी अशी मागणी करणार आहोत, असं अजित नवले म्हणाले.

“तोवर आंदोलन मागे घेणार नाही”

तर डॉ. अशोक ढवळे यांनीही दूध दरावर भाष्य केलं आहे. आज दिल्लीत बैठक झाली त्यात 40 रुपये भाव मलावेत यावर शिक्कामोर्तब झालं. 35 रुपयावर आमचं समाधान नाह. मोदी सरकारचा भुकटी आयात करण्याचा निर्णय घातक आहे. त्याचा आम्ही निषेध केला आहे. जोपर्यंत 40 रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आमचा निर्णय झाला आहे. दुधासोबत इतर शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत. महाविकास आघाडीच्या खासदारांच्या वतीने ते मुद्दे उचलले जातील. असा आम्हाला विश्वास आहे, अशोक ढवळे म्हणाले.

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही दूध दरावरून आग्रही भूमिका मांडली आहे. सिन्नरच्या वावीत बोलताना राजू शेट्टी यांनी इशारा दिलाय. शेतकरी अनुदानापासून वंचित आहे.. आमची मागणी एवढीच आहे आता पशू गणना झाली आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान जमा करावे. दूध संघाने द्यावा किंवा सरकारने द्यावा चाळीस रुपये परवडत नाही. चाळीस रुपये भाव मिळालाच पाहिजे यावर आम्ही ठाम आहोत, असं राजू शेट्टी म्हणालेत.