बाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली

| Updated on: Jun 21, 2021 | 1:22 PM

नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली.(MNS Raj Thackeray Comment on Navi Mumbai International Airport Name Issue)

बाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
Follow us on

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद शिगेला पोहोचला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport) दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीकडून या विमानतळाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली. “नवी मुंबईत होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई विमानतळाचं ते एक्स्टेंशन आहे. त्यामुळे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राहणार आहे,” असे राज ठाकरे म्हणाले. (MNS Raj Thackeray Comment on Navi Mumbai International Airport Name Issue)

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरच्या मुद्द्यावर भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतंच राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी प्रशांत ठाकूर यांनी नवी विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. “नवी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी आमची जुनी मागणी आहे. या मागणीला घेऊन 24 जूनला आम्ही सिडकोला घेराव घालणार आहोत. या आंदोलनाची आणि आमच्या मागणीची राज ठाकरे यांना माहिती दिली. मनसेची राज ठाकरेंची काय भूमिका आहे हे तेच स्पष्ट करतील,” असे प्रशांत ठाकूर म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले?

“प्रशांत ठाकूर माझ्याकडे येऊन गेले. नवीन होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची त्यांची मागणी आहे. सरकारची भूमिका आहे बाळासाहेबांचं नाव देण्याची.. त्याच्यातून हा संघर्ष सुरु आहे. मोर्चे, धरणं सुरु आहे. माझा पाठिंबा घेण्यासाठी ते आले होते. मी वस्तूस्थिती समोर ठेवली. कोणतंही विमानतळ येतं, ते शहराबाहेर येतं. तेव्हाची मुंबई पकडली, ते विमानतळ सांताक्रूझला गेलं. त्यावेळी मुंबई विकसित झालेली नव्हती. मग वाढवत ते सहारपर्यंत गेलं आणि मग त्याला सांताक्रुझ विमानतळ आणि सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यात आलं.” असे राज ठाकरे म्हणाले.

“मागे जेव्हा असं विमानतळ बनवायचं ठरलं, जीव्हेकेंना मी विचारलं हे कसलं विमानतळ आहे. त्यांनी माहिती दिली होती, आताचं विमानतळ आहे ते डोमेस्टिक असेल, आणि ते विमानतळ आंतरराष्ट्रीय असेल. आता जे विमानतळ नवी मुंबईत होत असलं तरी ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुनच टेक ऑफ होणार आहे. त्यासाठी शिवडी-न्हावाशेव रोड होत आहे. ते मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळेच त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राहणार,” अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरेंनी मांडली.

नवी मुंबईत असले हे मुंबई विमानतळ म्हणूनच ओळखलं जाणार 

“मुंबई विमानतळाचं ते एक्स्टेंशन आहे नवी मुंबईत. आंतराराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचंच नाव असेल असं मला तर वाटतं. विमानतळांना नाव देण्याचं वगैरे हे केंद्र सरकार ठरवतं. त्यामुळे आंतरराष्ठ्रीय विमानतळ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच होईल. बाळासाहेब हे आदरणीय आहेत, दि बा पाटील हे ज्येष्ठ नेते होते. शिवरायांचं नाव देणंच उचित ठरणार आहे. नवी मुंबईत असले तरी विमानतळ हे मुंबई विमानतळ म्हणूनच ओळखलं जाणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

विमानतळाला अजून पाच एक वर्ष लागतील

“इथे जागा नसल्यामुळे नवी मुंबईत विमानतळ होतंय.. त्यामुळे त्या विमानतळालाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असेल असं मला वाटतंय.. या विमानतळाला अजून पाच एक वर्ष लागतील. हा वाद जाणीवपूर्वक होतोय की नाही याची मला कल्पना नाही, पण आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहणार आहे,” असे राज ठाकरे म्हणाले.

“बाळासाहेब असते तर स्वत: त्यांनी सांगितलं असतं महाराजांचंच नाव द्या. महाराजांच्या नावावरती चर्चा काय होऊ शकते? ज्यांना गोंधळ घालायचाय त्यांना घालू द्या.. पण मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असणार,” असेही ते म्हणाले. (MNS Raj Thackeray Comment on Navi Mumbai International Airport Name Issue)

संबंधित बातम्या :

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची आग्रही मागणी, रायगड ते नवी मुंबई मानवी साखळी

नवी मुंबई विमानतळासाठी महाविकासआघाडी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम; तर 18 गावांचा दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब