Ajit Pawar : अजितदादांच्या निधनानंतर पहिली मोठी घडामोड, तीन नेत्यांचे राजीनामे; सुनील तटकरेंविरोधात नाराजी?

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी हयात असताना नाकारलेले तीन नेत्यांचे (मनोज व्यवहारे, सुभाष मालपाणी, सचिन जाधव) राजीनामे आता पक्षाने मंजूर केले आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरोधातील नाराजीतून हे राजीनामे दिले होते. कोणतीही विचारपूस न करता ते स्वीकारल्याने पक्षात खळबळ उडाली असून, अजितदादांच्या अनुपस्थितीत पक्षासमोरील आव्हाने वाढली आहेत.

Ajit Pawar : अजितदादांच्या निधनानंतर पहिली मोठी घडामोड, तीन नेत्यांचे राजीनामे; सुनील तटकरेंविरोधात नाराजी?
अजित पवार
| Updated on: Mar 04, 2026 | 10:40 AM

राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील तीन नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. अजितदादा हयात असतानाच या तीन नेत्यांनी राजीनामे दिले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरोधातील नाराजीवरून त्यांनी राजीनामे दिले होते. पण ,अजितदादांनी हे राजीनामे मंजूर केले नव्हते. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर या नेत्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजितदादांच्या निधनानंतर पक्ष सावरण्याचं सोडून नेत्यांचे राजीनामे मंजूर करण्यात येणं हा राष्ट्रवादीसाठीच मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

नेमकं काय घडलं ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख असलेले अजित पवार यांचा गेल्या महिन्यात (28 जानेवारी) बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र अजित दादा हयात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, 26 जानेवारी रोजी,  अजित पवार यांची भेट घेतली होती. आणि आपले राजीनामे त्यांनी अजित पवारांकडे सोपवले होते. पण अजित दादांनी कांही ते राजीनामे मंजूर केले नाहीत.

मात्र आता अजित दादांच्या जाण्यानंतर महिनाभरानंतर एक नवी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या सर्व सेलच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे हे, कोणतही कारण न विचारताच मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे पक्षात मोठी खळबळ माजली आहे.

या पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे. अजित पवार हयात होते तेव्हा वेगळी वागणूक मिळायची आणि  आता अजित दादा नाही तर वेगळी वागणूक मिळत्ये, अशी खंत सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.

कोणी कोणी दिले राजीनामे ?

अजित पवार यांच्याकडे ज्यांनी राजीनामे दिले होते, त्यांची नावंही समोर आली आहे. मनोज व्यवहारे – असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष, सुभाष मालपाणी- उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष आणि सचिन जाधव – मोटार मालक वाहतूक संघटना प्रदेशाध्यक्ष, अशा तिघांनी पदांचे राजीनामे दिले होते. आणि आता त्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी पद का सोडलं, राजीनामा का दिला, याचं कारणही विचारण्यात आलेले नसून सरळ राजीनामा स्वीकारून तो मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान ज्यांनी ज्यांनी राजीनामा दिला आहे, त्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संदर्भात नाराजी आहे, अशी माहिती समोर येत आहे. या घडामोडींमुळे पक्षात खळबळ माजली असून कुजबूज सुरू झाली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून या संदर्भात काही भूमिका मांडण्यात येणार का, ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

 

Follow Us