राष्ट्रवादीचं मेगा प्लानिंग, सुनेत्रा पवार यांचं रिलाँचिंग होणार, काय आहे योजना?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे लवकरच रिलॉंचिंग होणार आहे. 'आपल्या वहिनी आहेत ना !' या नव्या कँपेनद्वारे आता सुनेत्रा वहिनींचे रिलाँचिंग करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकस्मात विमान अपघाती मृत्यूनंतर पक्षाचे जबाबदारी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर येऊन ठेपली आहे. सुनेत्रा पवार या राजकारणात नवख्या असल्याने त्यांना ही जबाबादारी कितपत सांभाळता येईल याविषयी अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडीया नावाने टीका करुन वाद ओढवून घेतला, त्यात आता राष्ट्रवादी पक्षाने आता सुनेत्रा पवार यांचे रिलाँचिंग करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाची धुरा सांभाळली आहे. तरी पक्षातील धुसफूस वाढल्यामुळे राष्ट्रवादीत सगळेच काही आलबेल नसल्याचेच चित्र समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर, २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात सुनेत्रा पवार यांचे ‘रिलॉन्चिंग’ होणार आहे.
‘आपल्या वहिनी आहेत ना !’
अजित पवार हयात असताना ‘एकच वादा, अजित दादा’ ही घोषणा लोकप्रिय झाली होती. आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या जाहीर कार्यक्रमात ही घोषणा कार्यकर्त्यांच्या तोडी असे आणि बॅनरही ही घोषणा लिहिली जात असे. मात्र आता ‘आपल्या वहिनी आहेत ना !’ या नव्या घोषवाक्यासह महाराष्ट्रभरात सुनेत्रा पवार यांचे दौरे आयोजित करण्यात येणार असल्याचे समजते. हे रिलाँचिंग कँपेन प्रशांत किशोर यांच्या रणनीतीनुसार होणार असल्याचे सांगण्यात येते.
प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली कँपेन
प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांनी देखील गुलाबी रंगाचा वापर करुन विधानसभा निवडणूकीच्या आधी लाडकी बहिण योजनेचा वापर करत कँपेन राबवले होते. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या ‘मॅट्रिझ’ (Matriz) या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली हे अजितदादांचे गुलाबी रंगाचा वापर करीत हे अत्यंत प्रभावी कँपेन राबवण्यात आले होते.अजितदादांच्या सभांचे स्टेज, बॅनर्स, गाड्या आणि प्रचार साहित्य पूर्णपणे गुलाबी रंगात डिझाईन करण्यात आले होते. लाडकी बहिण योजना एन्कॅश करण्यासाठी आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली होती.
