44 दिवस, 5 शहरं अन्… निदा खानच्या लपाछपीचा खेळ कसा संपला? शेवटच्या तासाभरात काय घडलं?
नाशिकमधील गाजलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला ४४ दिवसांनंतर छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. तेलंगणात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. या अटकेमुळे आता मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

नाशिकमधील नामांकित कंपनीत गाजलेल्या आणि लव्ह जिहादच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेल्या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून निदा खान पोलिसांना गुंगारा देत होती. निदा खानला छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत अटक केली. ती राजकीय आश्रयाच्या शोधात छत्रपती संभाजीनगर या शहरात आली होती. त्यानंतर निदा खान तेलंगणात पळून जाण्याच्या तयारीत होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या अटकेमुळे आता या प्रकरणामागील मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
४४ दिवस आणि ५ शहरांमधील लपाछपी
नाशिकमधील घटनेनंतर निदा खान अटकेच्या भीतीने फरार झाली होती. या काळात तिने पोलिसांना चकवा देण्यासाठी ती सातत्याने आपली ठिकाणे बदलत होती. यानंतर तपासातून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यानुसार, निदा खानने सर्वात आधी ठाणे गाठले, त्यानंतर काही दिवस तिने भिवंडीत आश्रय घेतला. यानंतर तिने मुंबई आणि सोलापूरमधील आपल्या नातेवाईकांकडे मुक्काम ठोकला. निदा खानने मालेगावमध्ये स्थानिक स्तरावर मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. पण तिथे तिचे प्रयत्न अपयशी ठरले.
संभाजीनगरमार्गे तेलंगणात जायचा होता प्लॅन
मालेगावमध्ये मदत न मिळाल्याने निदाने आपला मोर्चा छत्रपती संभाजीनगरकडे वळवला. या ठिकाणी एका राजकीय नेत्याचा किंवा गटाचा आश्रय घेऊन तिने कायदेशीर कारवाईपासून वाचण्याचा तिचा प्रयत्न होता. जर येथेही मदत मिळाली नसती, तर तिने नांदेडमार्गे तेलंगणा राज्यात पळून जाण्याचे पूर्ण नियोजन केले होते. त्याचवेळी नाशिक पोलिसांचे पथक सातत्याने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्तहेरांच्या मदतीने निदाच्या मागावर होते. निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. ती तेलंगणाच्या दिशेने रवाना होण्यापूर्वीच पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. या अटकेमुळे लव्ह जिहाद प्रकरणातील अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नेमके प्रकरण काय?
नाशिकच्या टीसीएस कंपनीत कार्यरत असलेल्या अनेक हिंदू तरुणींना निदा खानने जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्याचा, तसेच लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवण्याचा तिचा प्रयत्न होता, असे आरोप तिच्यावर आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नाशिक शहरात संतापाची लाट उसळली होती. हिंदू संघटनांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेत निदा खानच्या अटकेसाठी रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. सोशल मीडिया आणि स्थानिक स्तरावर या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटल्याने पोलिसांवर आरोपीला पकडण्यासाठी मोठा दबाव होता.
