नितेश राणे हे आता करमणुकीचं साधन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचा घरचा आहेर, बकरी ईदवरून वातावरण तापलं
बकरी ईदच्या कुर्बानी वरून मंत्री नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यानं यावरून आता राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मंत्री नितेश राणे यांनी बकरी ईदवर प्रतिक्रिया देताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर आता वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. विरोधकांकडून तर नितेश राणे यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आलीच आहे. परंतु आता त्यासोबतच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील राणे यांना घरचा आहेर देण्यात आला आहे. नितेश राणे यांच्या या विधानावर बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रीस नायकवडी यांनी राणे यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले इद्रीस नायकडी?
मंत्री नितेश राणेंना आता कोणी सिरीयस घेत नाही, एंटरटेनमेंट साधन म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, असा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रीस नायकवडी यांनी नितेश राणे यांना लगावला आहे. बकरी ईदच्या कुर्बानीवरून नितेश राणे यांनी केलेल्या विधानावरून इद्रीस नायकवडी यांनी राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर नितेश राणे यांनी आम्हाला धार्मिक तत्वे कसे पाळावे याचे मार्गदर्शन करण्याची गरज नाही, समाजात दुफळी निर्माण करून, हिरो म्हणून पुढे येण्यासाठी त्यांचा सातत्याने बालिशपणाचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका देखील आमदार नायकवडी यांनी यावेळी केली.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मुस्लिम समाजाकडून गाईला राष्ट्रीय पशु म्हणून जाहीर करण्याची मागणी होत आहे. या मागणीकडे सरकारने गंभीरपणे लक्ष देऊन, गाय राष्ट्रीय पशु म्हणून जाहीर करावा, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली, ते सांगलीमधील मिरज येथे बोलत होते. दरम्यान आता इद्रीस नायकवडी यांनी नितेश राणे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. नितेश राणे हे नायकवडी यांना काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुन नार्वेकर यांनी देखील बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलीस महासंचालकांना काही सूचना केल्या होत्या. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अत्यावशक तयारी करा, राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्याचं उल्लंघन होणार नाही, याकडे लक्ष द्या. तसेच गोरक्षकांवर हल्ले होणार नाही, याची खबरदारी घ्या असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं.