
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्याकडे असणाऱ्या बहुतेक सर्वच जबाबदाऱ्या सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आल्या आहेत. अजित दादांकडे असणारे अर्थ खाते सोडता इतर खाती आता सुनेत्रा पवार सांभाळणार आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून राजकारण केलं जात आहे. अनेक नेत्यांनी सुनेत्रा पवार यांनी शपथविधीला घाई केल्याचा आरोप केला आहे. तर काही नेत्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित केली आहे. अशातच आता सुनेत्रा पवार यांच्या शपथविधावर बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी खळबखजनक विधान केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना उद्देशून झुरळ आणि ढेकणं असं म्हटलं होतं. यावर बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, ‘या ढेकणा, झुरळांनी केलंय काय तर अपघातात निधन झालेल्या अजित पवारांच्या पत्नीला उपमुख्यमंत्री केलं. त्यामुळे जरांगे पाटलाची मानसिकता तपासली पाहिजे. जरांगे पाटील हा शरद पवार, रोहित पवार, बजरंग सोनवणे यांची स्क्रिप्ट वापरतो. तो स्वतःच्या डोक्याने काही बोलत नाही, त्यामुळे तो डोक्याचा भाग कमी असलेला माणूस आहे. त्याच्यावर मी जास्त काही बोलत नाही.
अजित पवार यांच्या निधनावर बोलताना हाके यांनी म्हटले की, अजित पवार आणि आमची जरी सामाजिक आणि वैचारिक लढाई असली तरी त्यांचा मृत्यू हा अनाकलनीय आहे. घटना घडली त्या दिवशी दिवसभर मला जेवणही गेले नाही, अशी घटना घडायला नको होती. सुनेत्रा ताई पवार यांच्या शपथविधीचे अनेक जण भांडवल करत आहेत. रोहित पवारांनी अजित पवारांच्या मृत्यूचे भांडवल करण्यापेक्षा त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर समोर सादर करावेत. बीडच्या खासदाराने मागणी केली असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे.
पुढे बोलताना हाके म्हणाले की, ‘सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर कोणी कितीही टीका केली असली तरी राजकारणात टायमिंगला महत्त्व असते. जर त्यांनी हा टाइमिंग साधला नसता तर राजकारणात कुशल पट्टू म्हणून प्रसिद्ध असलेले शरद पवारांनी नक्कीच भाकरी फिरवली असती आणि सुनेत्रा ताईंवर अन्याय झाला असता. अजितदादांपेक्षाही सुनेत्रा ताई चांगले राजकारण करतील’ असा विश्वासही हाके यांनी व्यक्त केला आहे.