वारस हक्काने वडिलांची मालमत्ता मिळते, परंतु पक्ष मिळत नाही, रामदास कदम यांनी पुन्हा ठाकरेंना डिवचलं
शिवसेना पक्षाचं चिन्ह कोणाचं या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे.

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. तर दुसरीकडे अजून शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद बाकी आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वारसहक्काने पैसा मिळतो, पक्ष मिळत नाही. वारसाहक्काने वडिलांची मालमत्ता मिळते, परंतु पक्ष मिळत नसतो. या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला तर जेव्हा सुप्रीम कोर्टात आमचे वकील युक्तिवाद करतील तेव्हा या गोष्टी अधिक स्पष्ट होतील, असं कदम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कापिल सिब्बल यांचा युक्तिवाद पाहून शिवसेना ठाकरे गटातील काही नेते हे उत्साही आहेत, त्यांना वाटत आहे की, काहीतरी चांगलं होईल असा प्रश्न देखील यावेळी कदम यांना विचारण्यात आला, यावर प्रतिक्रिया देताना कदम यांनी म्हटलं की, काही लोक हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे असतात, त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या, लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. असा मला विश्वास आहे.
राहुल गांधींवर प्रतिक्रिया
दरम्यान राहुल गांधी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत, ते छांत्रो की गुंज कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, यावर देखील कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे, मी राहुल गांधी यांना एवढंच विचारेल की तुम्ही गरिबी हटावचा नारा दिला होता. किती गरिबी हटवली, शेवटच्या तळागाळातील माणसांसाठी तुम्ही काय केलं? काँग्रेस सत्तेत असताना फक्त हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये दरी पाडण्याचं काम झालं. माझा हा दावा आहे, मी जबाबदारीने बोलत आहे. मुस्लिम समजाची मतं घ्यायची सत्ता भोगायची. पण त्याच मुस्लिम समाजासाठी तुम्ही काय केलं असा सवालही यावेळी कदम यांनी राहुल गांधी यांना केला आहे. फक्त सत्तेवर डोळा ठेवून असे कार्यक्रम घेतले जातात. आता सगळं संपलं आहे. मग शाळेतील मुलं आपल्यासोबत येतील का? आणि ते जर आपल्यासोबत आले तर आपण यशस्वी होऊ का? असा त्यांचा बालिश प्रयत्न सुरू आहे, असा टोला यावेळी कदम यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.