नाना पटोलेंनी घेतले भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन, म्हणाले, दिशा देण्याचं…

| Updated on: Oct 08, 2022 | 5:08 PM

पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यानंतर नाना पटोले यांनी भगवान गडावर येऊन समाधीचे दर्शन घेतले.

नाना पटोलेंनी घेतले भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन, म्हणाले, दिशा देण्याचं...
नाना पटोलेंनी घेतले भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन
Image Credit source: tv 9
Follow us on

कुणाल जायकर, Tv9 मराठी, प्रतिनिधी, अहमदनगर : अहमदनगरला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पाथर्डी येथील भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. भगवानगड हा समाजसुधारकाचा गड आहे. या मागास भागात सर्वांना दिशा देण्याचे काम भगवान बाबांनी केलं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. विशेष म्हणजे ओबीसी (OBC) समाजासाठी भगवान बाबांचं मोठं काम आहे, असं मत पटोले यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्रात ओबीसी समाजाची चळवळ या गडापासून उभी करावा लागणार आहे. भगवान बाबांचे विचार पुढे नेण्यासाठी मी आज आलोय, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथे दोन दिवसांपूर्वी दसरा मेळावा पार पडला. त्यानंतर नाना पटोले यांनी भगवान गडावर येऊन भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आलंय. यावेळी भगवान सेनेचे बाळासाहेब सानपदेखील उपस्थित होते.

पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यानंतर नाना पटोले यांनी भगवान गडावर येऊन समाधीचे दर्शन घेतले. मात्र आमचा ओबीसीचा मेळावा निश्चित झाला होता. दोन दिवस पहिले त्यांचा दसरा मेळावा आल्याचं पटोले यांनी सांगितलं.

नाशिक येथे बस आणि ट्रकच्या झालेल्या अपघाताचे खापर नाना पटोले यांनी राज्य सरकारवर फोडले आहे. नाशिक दुर्घटनेत जो मृत्यू झाला आहे त्याचे वाटेकरी राज्यातील सरकार असल्याचं पटोले यांनी म्हटलंय. रस्त्यात अनेक खड्डे आहेत. खड्डे चुकवण्यामध्ये तो एक्सिडेंट झाला आहे. त्यामुळे त्या निरपराध प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचं ते म्हणाले.

सध्या देशात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपला सत्तेची एवढी गर्मी झाली आहे. त्यांचे डोळेच आंधळे झाले आहेत. त्यांना वास्तविकता कळायला कारण नाही. राहुल गांधी आज देशाच्या तिरंग्यासाठी लढत आहेत.

देशाचा तिरंगा आणि संविधान धोक्यात आला आहे. जेवढी राहुल गांधींच्या यात्रेची चेष्टा करतील तेवढ्याच ताकतीने लोकं जोडल्या जातील, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्रात जेव्हा यात्रा येईल तेव्हा या यात्रेचा स्वरूप विशाल होईल, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.

पटोले म्हणाले, महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती खूप वाईट आहे. राज्याला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. मी भगवान बाबांना प्रार्थना करतो आमचा महाराष्ट्र यशवंतराव, वसंतराव नाईक, विलासराव देशमुख यांच्या काळात होता, असा पुन्हा बनवा.