Sanjay Jahav: दुष्काळाच्या बैठकीत काजू-बदामचा पाहुणचार, असंवेदनशीलतेनंतर खासदार संजय जाधव यांची अरेरावी

MP Sanjay Jadhav Drought Review Meeting: नांदेडमध्ये मराठवाडा विभागाच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत असंवेदनशीलता दिसून आली. एकीकडे शेतकरी संकटात असताना या बैठकीत लोकप्रतिनिधींसाठी दुष्काळाच्या बैठकीत काजू-बदामचा पाहुणचार समोर आला. त्यावर खासदार संजय जाधव यांनी भावना व्यक्त केल्या

Sanjay Jahav: दुष्काळाच्या बैठकीत काजू-बदामचा पाहुणचार, असंवेदनशीलतेनंतर खासदार संजय जाधव यांची अरेरावी
खासदार संजय जाधव
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 19, 2026 | 1:18 PM

गजानन देशमुख, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : नांदेड येथे आयोजित मराठवाडा विभागाच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा बैठक आज भलत्याच कारणासाठी गाजली. छत्रपती संभाजी नगर विभागाच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नांदेडमध्ये ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. आढावा बैठकीत लोकप्रतिनिधिनी मारला काजु बदामवर ताव मारताना दिसले. त्यावरून राज्यातून टीकेची झोड उठली. सोशल मीडियाच्या या जमान्यात टीकेचे बाण सुटले आणि मग मंत्र्यांसह उपस्थित लोकप्रतिनिधींना सारवासारव करावी लागली. ती करतानाचा त्यांचा केविलवाणा प्रयत्नही समोर आला. तर खासदार संजय जाधव यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये प्रश्न विचारणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवरच अरेरावी केली. अशा बैठकांमध्ये संवेदनशीलता जपणे आवश्यक असताना झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी, खेद व्यक्त करण्याऐवजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार जाधव पत्रकारांवरच संतापल्याचे दिसले.

हा प्रशासकीय भाग

काजू बदाम काही मंत्री आमदार खासदार ठेवत नाहीत. हा प्रशासनाचा भाग असतो. पुढाऱ्यांना बदनाम करायची गरज नसते. मी परभणी वरुन आलोय, सकाळ पासून नाष्टा केला नव्हता, समोर ढिश ठेवल्या होत्या. त्यातील बदाम उचलून खाल्ला. ठेवलं समोर तर उचलणार नाही का? ठेवणाऱ्यांना विचारायला हवं की तुम्ही का ठेवलं ते? त्यांना नका विचारू केवळ आम्हाला विचारा, अशी प्रतिक्रिया खासदार संजय जाधव यांनी दिली. त्यांनी याप्रकरणी खापर प्रशासकीय अधिकाऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न केला.

मग माध्यमांवरच संताप

काही लहान मुलांसारखे प्रश्न विचारता का? माझ्यावर टीका होत आहे, तर होऊ द्या. मी स्वीकारायला तयार आहे. तुम्ही त्याची चिंता करू नका. सर्वच खासदार-आमदारांसमोर काजू-बदाम ठेवलेले होते. मी खाल्लं. त्याच्यात इतका विषय का आला. तुमच्यासमोर ठेवले तर तुम्ही खाणार नाहीत का? काय विचारावं. तुम्ही कोणत्या गोष्टीला कुठं घेऊन जात आहात. एखाद्याला भूक लागली असेल तर खाल्लं असेल. त्यात इतकी काय मोठी गोष्ट आहे. दुष्काळ आहे म्हणून कोणी काही खात नाही का? अंबादास दानवे घरी बसून खात नाही का? जिल्हाधिकाऱ्यांना विचारा की, त्यांनी हे ड्रायफ्रूट तिथे का ठेवले ते. ड्रायफूटची किंमत असेल किती तर 5, 50- 100 रुपये. तुम्ही राईचा पर्वत कराल का आता? मीडियाने सुद्धा दुष्काळावरच बोलले पाहिजे, काजू-बदाम खाण्यावर बोलू नका, अशी अरेरावी संजय जाधव यांनी केली. दुष्काळा विषयीचा प्रश्न विचारल्याने शिंदे सेनेचे खासदार संजय जाधव यांचा तिळपापड झाल्याचे दिसून आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us