मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज पारनेर येथे मराठा संवाद सभा झाली. “आरक्षण समजून घेतले पाहिजे. राज्यात लाखो नोंदी सापडतायत. आज नोंदी सापडल्यामुळे घराघरातील मराठयांना आरक्षणचा फायदा होत आहे. कोणापुढे हात पसरायचा नाही. 75 वर्षात आरक्षण असूनही दिले नाही. शंभर दोनशे वर्षांपूर्वीच्या नोंदी सापडत आहेत. ते आपल्या आरक्षणात घुसले आहेत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “दुसऱ्याच्या नादात आपल्या लेकरांना फाशी घ्यायची वेळ आली आहे. आज एक ही नेता आपल्या आरक्षणाच्या बाजूने बोलत नाही. याना आपल्या बाप जाद्यांनी मोठ केलं आहे. आंदोलन आता शेवटच्या टप्प्यात आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“सत्ताधारी आणि विरोधकांनी मला शत्रू मानायला सुरुवात केली आहे. तुम्हाला मी मॅनेज होत नाही, आणि तुम्हाला गिनत नाही. त्यांचे एकच स्वप्न आहे याला बाजूला काढा. या जन चळवळीमुळे माझ्या मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे. तुम्हला एखाद्याने सहा महिने चकरा मारायला लावल्या तर तुम्ही पण चिडणार. आज देतो, उद्या देतो म्हणत होते. मुंबईमध्ये सर्व पक्षांनी ठराव केला होता 30 दिवसात आरक्षण देतो. आरक्षण विषय जवळ आला होता आणि हे मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितले होते” असं मनोज जरांगे म्हणाले.
57 लाख नोंदी मिळाल्या, कशा आणि कोणी लपवून ठेवल्या?
“आचारसंहिता लागण्याअगोदर सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करतो म्हणाले होते. पण कोणी खडा टाकला नाही आणि काहीच निर्णय घेतला नाही. 57 लाख नोंदी मिळाल्या, कशा आणि कोणी लपवून ठेवल्या?. त्याच वेळी नोंदी मिळाल्या असत्या, तर मराठा समाज आज प्रगत जात असती. 10 टक्के घ्यायला लावायचा डाव होता. विधानसभेच्या पटलावर तुम्ही सांगता मराठा समाज मागास सिद्ध झाला आहे मग, 50 टक्क्यांच्या आत आणि ओबीसींच्या 27 टक्क्यांमधून का दिले नाही?” असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.
भुजबळ हिमालयात गेला काय?
“देवेंद्र फडवणीस म्हणतात 10 टक्के आरक्षण दिले त्यामुळे मराठे खुश आहेत का? मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले आणि मराठ्यांच्या विरोधात बोलत आहेत. जो नोंदीला विरोध करत होता त्यांनी सर्वात आधी कुणबी प्रमाणपत्र काढले. आमच्या विरोधात कोणी गेले तर त्याचा सुफडा साफ करत असतो. तो जामनेरचा म्हणतो माझे खूप लाड केले, काय लाड केले? फडवणीस साहेबाला मी सहा महिन्यांपासून बोललो नाही. काय करताल जेल मध्ये टाकताल, तर जेलमध्ये आंदोलन करेल, कैद्यांना आरक्षण समजूल सांगेल. तो ( भुजबळ ) कुठे गेला काय माहित, हिमालयात गेला काय, आणि मराठ्या बद्दल बोलला तर सुट्टी नाही” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.