आनंदाने नटून निघालेलं वऱ्हाड एका क्षणात संपलं, पालघरमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत; मृतांची नाव समोर
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धनिवारी येथे साखरपुड्याच्या वऱ्हाडाच्या टेम्पोला झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांचा समावेश आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एक अत्यंत भीषण आणि काळीज हेलावून टाकणारा अपघात झाला आहे. या अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. साखरपुड्याच्या आनंदाच्या सोहळ्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या टेम्पोला शनिवारी अपघात झाला. या अपघाताने संपूर्ण पालघर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या अपघातातील सर्वात धक्कादायक माहिती म्हणजे यात एकाच कुटुंबातील ६ जणांचा अंत झाला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
एकाच कुटुंबातील ६ जणांचा अंत
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत पावलेले बहुतांश नागरिक हे डहाणू तालुक्यातील कासा-सायवन रस्त्यावरील बापू गावातील लाखात पाडा येथील रहिवासी आहेत. या अपघातात एकाच गावातील आणि त्यातही एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याने लाखत पाड्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आनंदाने नटूनथटून निघालेल्या या वऱ्हाडींवर काळाने असा घाला घातल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
१४ जण गंभीर जखमी, वेदांता रुग्णालयात उपचार सुरू
या भीषण अपघातात १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. सर्व जखमींना तात्काळ डहाणू येथील वेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मृतांची नावे समोर
१. सुरेश रत्ना लाखत
२. पांडू गणपत लाखत
३. काळू गोविंद लाखत
४. सुनील अर्जुन दांडेकर
५. चिमा गोविंद कुरहाडा
६. नमिता विठ्ठल दांडेकर
७. सारिका संतोष लाखत
८. आयुष सिताराम लाखत
९. सागर नामदेव शेंडे
१०. वंदना शिवराम वळवी
११. सलोनी शिवराम वळवी
१२. अजय अहाडी
१३. रियांशी संतोष लाखत
राजकीय नेत्यांकडून मदत
या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय आणि राजकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी उशिरा रात्री डहाणू येथील वेदांता रुग्णालयाला भेट देऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांना योग्य त्या उपचारांचे निर्देश दिले. त्यानंतर त्यांनी कासा उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृतकांच्या नातेवाईकांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
तसेच पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा आणि आमदार राजेंद्र गावित यांनीही घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेत पीडित कुटुंबांना धीर दिला. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे मृतकांवर लाखात पाडा येथील स्मशानभूमीत होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी स्वतः उपस्थित राहणार आहेत. या अपघातामुळे संपूर्ण डहाणू आणि पालघर तालुक्यावर शोककळा पसरली असून, वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
