Ritu Tawde : धक्कादायक! मुंबईच्या महापौर रितू तावडे नव्या वादात, फक्त Likes साठी खर्च करणार 25 लाख रुपये
मुंबईच्या महापौर रितू तावडे नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. पालिका आता फक्त Likes साठी 25 लाख रुपये खर्च करणार आहे.

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी : मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एका निर्णयाने वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. मुंबईच्या महापौर तावडे या सोशल मीडियावर लाइक्स मिळवण्यासाठी तब्बल 25 लाख खर्च करणार आहेत. मुंबई महापालिका आता महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च करणार आहे. महापौरांचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये आज प्रस्ताव मांडला जाणार आहे. महापालिकेच्या या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा आजच्या स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मांडण्यात येईल. या प्रस्तावावरून पुन्हा महापौर रितू तावडे यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे. 1 वर्षाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखाहून अधिक खर्च केला जाण्याची शक्यता आहे. 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या एक वर्षाच्या कालावधीसाठी 25 लाख 12 हजार 786 लाख रुपये महापौरांच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगर पालिका खर्च करणार आहे. मुंबई महानगर पालिका अधिनियम 1888 मधील कलम 69 क च्या सुधारित तरतुदीनुसार स्थायी समितीमध्ये महापौरांच्या प्रसिद्धीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या अगोदर महापौरांच जनसंपर्क सांभाळण्यासाठी काढण्यात येणाऱ्या निविदेवरून जोरदार टीका झाली होती. त्यानंतर देखील सोशल मीडियासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
प्रस्तावात नेमकं काय म्हटलं आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षभरात 25,12,786 रुपये खर्च करण्यासाठी 19 ऑगस्ट म्हणजे आज प्रस्ताव हा स्थायी समितीसमोर ठेवला जाईल. खरंतर पालिकेचा जनसंपर्क विभाग आणि सोशल मीडिया यंत्रणा आधीच आहे. परंतु नव्या करारामुळे एक समर्पित सोशल मीडिया टीम महापौरांसाठी सज्ज होणार आहे. सोशल मीडियावर अधिकृत कार्यक्रमाची माहिती घेऊन प्रसारित करण्याचा खर्च हा दरमहा 2.09 लाख रुपये इतका आहे. तर दिवसाला 6900 रुपये इतका आहे. नव्या प्रस्तावानुसार एका वर्षांसाठी महापौरांच्या सोशल मीडियाचे व्यवस्थापन करण्यासाठी ‘रनटाइम सोल्युशन’ची निवड करण्यात आली आहे. ही एजन्सी दैनंदिन कार्यक्रम, बैठका, पाहणी दौरे आणि सार्वजनिक कार्यक्रमांची प्रसिद्धी करेल. या निर्णयावरून मनसेने टीका केली आहे. ‘मुंबईकर यासाठी कर भरत नाही. पालिकेने रस्ते, रुग्णालय, शाळा, साफसफाई आणि आवश्यक नागरी सेवा सुधारण्यासाठी पैसा खर्च करावा, अशी नागरिकांची अपेक्षा असते, अशी टीका नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी केली आहे.
