अकोला: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी येत्या 3 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी येत्या 1 मे रोजी राज्यात शांती मार्च काढणार असल्याचं जाहीर केलं आहे. मनसे, भाजप आणि राज्य सरकारची (maha vikas aghadi) भूमिका पाहता. येत्या 3 मे रोजी राज्यात काहीही घडू शकते, अशी शंका व्यक्त करतानाच भोंग्याच्या विषयावरील सर्व पक्षीय बैठकीत काहीही बोलण्यास दिले नाही. त्यामुळेच आम्ही येत्या 1 मे रोजी राज्यात शांती मार्च काढणार आहोत. या मार्चमध्ये प्रत्येक संघटनेचं स्वागत केलं जाईल. मात्र. कोणत्याही राजकीय पक्षाला या मार्चमध्ये थारा नसेल, असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे एककीडे राज ठाकरे यांनी जाहीर सभेची घोषणा केलेली असतानाच आंबेडकरांचा शांती मार्चही लक्ष्यवेधी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्य सरकारने भोंग्याच्या विषयावर विरोधी पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीत फक्त भोंग्यावरच बोलण्यास सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने भोंग्या संदर्भात परवानगी दिली आहे. तो आदेश केंद्र सरकारला व इतर राज्य सरकारला लागू आहे. असे असताना या बैठकीत भोंग्याबाबत नवीन धोरण ठरविण्याबाबत चर्चा झाली. भोंग्याबाबत नवीन धोरण ठरवा असं राज्य सरकार केंद्र सरकारला सांगणार आहे. हा प्रकार वेगळाच आहे. या बाबतीत शंका निर्माण करणारी आहे. राज्य सरकार दबावाखाली असल्याची शक्यता आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांवरील ईडी व सीबीआयची चौकशी वाचविण्यासाठी राज्य सरकार हा खेळ करीत आहे का? असा सवाल आंबेडकरांनी व्यक्त केला.
मनसे हा महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही. मुंबईमधल्या सर्वच वॉर्डांमध्ये त्यांच अस्तित्व आहे का नाही, हे माहिती नाही. मात्र, मनसेही राज्यव्यापी संघटना असून ती मजबूत अशी संघटना असल्याचं मीडिया सारखं भासवत असते. पण मनसेचं जाळं राज्यभर नाही. ती एवढी मोठी संघटना नाही. त्यांचे अस्तित्व काही भागामध्ये प्रभावशाली आहे, याबद्दल दुमत नाही. मात्र, एवढे बळ यांच्या पाठीमागे आले कोठून? असा प्रश्न उपस्थित करीत कोणत्यातरी पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे, असे वाटतेये. त्याशिवाय ते मोठे होऊ शकत नाही, असा टोला त्यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे लगावला.
यावेळी त्यांनी राज्य सरकार पडणार नसल्याचं स्पष्ट केलं. राज्य सरकार पडेल, राज्य सरकार पडेल असं भाजप ज्या पद्धतीने म्हणत आहे. त्यावरून असे वाटते की हे सरकार पाच वर्ष टिकेल. भाजप फक्त वलग्ना करत आहे. या सरकारला कोणीही पाडू शकत नाही, असे भाकीतही त्यांनी केले.