Ajit Pawar : ‘आता जनतेनंच पाहावं, कसा कारभार सुरूय ते’; पूर आणि नुकसानग्रस्त भागांच्या पाहणीनंतर अजित पवारांचा राज्य सरकारवर निशाणा

एक महिना होऊन गेला, तरीही यांना मुहूर्त मिळेना, ग्रीन सिग्नल मिळेना, माहीत नाही. राज्यातील जनता आशेने पाहत आहे. मंत्र्यांच्या रिमार्कशिवाय काहीही होऊ शकत नाही. आता जनतेनेच पाहावे, कसा कारभार सुरू आहे, अशी टीका अजित पवार यांनी राज्य सरकारवर केली.

Ajit Pawar : आता जनतेनंच पाहावं, कसा कारभार सुरूय ते; पूर आणि नुकसानग्रस्त भागांच्या पाहणीनंतर अजित पवारांचा राज्य सरकारवर निशाणा
विरोधी पक्षनेते अजित पवार
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 05, 2022 | 11:11 AM

बारामती, पुणे : राज्यपालांची भेट ही दुष्काळ नाही, तर पूरग्रस्त भागाचा दौरा संपल्यानंतर मदतीसंदर्भात घेतली, अशी माहिती विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. शेतकरी मदतीपासून वंचित असून आता जनतेनेच पाहावे, कसा कारभार सुरू आहे ते, अशी टीकाही त्यांनी राज्य सरकारवर केली. ते बारामतीत बोलत होते. अतिवृष्टी (Heavy rain) झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पूरग्रस्त भाग आणि नुकसान याविषयी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांची नुकतीच भेट घेतली होती. त्याविषयी त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की राज्यात सध्या कुठेही दुष्काळ नाही. अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

‘पिके पूर्णपणे उद्ध्वस्त’

सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यानंतर राज्यपालांची भेट घेतली. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी गोगलगाईचा प्रादुर्भाव झाला आहे, काही ठिकाणी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. काही जण तर आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलायला लागले आहेत. हे राज्यासाठी भूषणावह नाही. त्यामुळे त्यांना तातडीने मदत करणे आवश्यक आहे. मनुष्यहानी झाली आहे, पाळीव प्राण्याची हानी झाली आहे, घरांची पडझड झाली आहे, छोटे-मोठे त्याचबरोबर गावातील रस्ते सगळ्याचीच दुरवस्था झाली आहे. जे काही पूल असतात, त्यांचीही पडझड झाली असून संपर्काचे माध्यमच बंद झाले आहे, असे अजित पवार म्हणाले.

काय म्हणाले अजित पवार?

‘ताबडतोब अधिवेशन बोलवा’

मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस होत आहे. तर काल पुन्हा जोरदार पाऊस झाला. हवामान खात्यानेही सांगितले आहे, की पाऊस पडणार. त्यामुळे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही हेच सांगितले, की लवकरात लवकर मंत्रिमंडळ अस्तित्वात आले पाहिजे, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, ताबडतोब अधिवेशन बोलावले पाहिजे. कारण पावसाळी अधिवेशन जुलैमध्ये होत असते. जुलै संपला. एक महिना होऊन गेला, तरीही यांना मुहूर्त मिळेना, ग्रीन सिग्नल मिळेना, माहीत नाही. राज्यातील जनता आशेने पाहत आहे. मंत्र्यांच्या रिमार्कशिवाय काहीही होऊ शकत नाही. आता जनतेनेच पाहावे, कसा कारभार सुरू आहे, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.