अजूनही वेळ गेली नाही, चूक मान्य करा, नाही तर… मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला मोठा इशारा
मराठा समाजाने जागं होणं गरजेचं आहे. मराठा समाजावर जाणूनबुजून अन्याय केला जात आहे. मराठा समाजाला आरक्षणात घालणं जीवावर आलंय, म्हणून हा खेळ सुरू आहे. त्यामुळे जागं राहा. आपल्याला आपली लढाई लढायची आहे, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठीचे दिलेले आदेश मागे घ्यावेत. झालेली चूक दुरुस्त करावी. अजूनही वेळ गेली नाही. मी मुख्यमंत्र्यांना पुन्हा आवाहन करतो. आपल्या मंत्र्याची चूक मान्य करा. नाही तर मी यापेक्षाही मोठं आंदोलन करेल, असा इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे सांगलीत आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी हा इशारा दिला.
मनोज जरांगे पाटील हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राज्यभरात मराठा समाजाशी संवाद साधत असून त्यांना आंदोलनाची रणनीती सांगत आहेत. येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे निर्णायक आंदोलन छेडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे दौरे सुरू आहेत. आज सांगलीत आले असताना त्यांनी पुन्हा एकदा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात जोरदार हल्लाबोल केला.
त्वरीत प्रस्ताव का मागवला?
नोंदणी अवैद्य करा म्हणून त्यांनी बावनकुळेंनी सांगितलं. त्यांची पत्रावर सांकेतिक भाषा आहे. मला मंत्र्यांच्या ओएसडी आणि पीएसने सांगितलं. अ लिहिलं म्हणजे या मागणीला प्रथम प्राधान्य द्यायचं, असा त्याचा अर्थ आहे. तसेच अधिकाऱ्याने काय कारवाई केली त्याचा प्रस्ताव पाठवायचा असतो. तुम्ही हस्तक्षेप करत नाही तर मग प्रस्ताव का मागितला? त्वरीत प्रस्ताव का मागवला? अवैध करून प्रस्ताव मागितला आहे. तुम्ही कितीही स्पष्टीकरण द्या. तुम्ही चुकले आहात. तुम्ही संपून जाल आणि तुमच्या पक्षाची वाट लागू शकते. मुख्यमंत्र्यांनी अजूनही आमच्या मंत्र्याने चूक झाल्याचं सांगून चूक दुरुस्ती करावी. वेळ गेली नाही, असं जरांगे म्हणाले. त्यांनी चूक दुरुस्त करू नये. मराठ्यांचं वाटोळं करावं, मग त्यांना कळेल. मी खूप ताकदीचं आंदोलन करणार आहे. सुट्टीच नाही. त्यामुळे चूक दुरुस्त करा, असा इशाराही त्यांनी दिला.
वेड्यात काढणार आहात का?
सरकार जातपडताळणी समितीत हस्तक्षेप करत नाही. सरकारला अधिकार नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने काम करत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे मीडियासमोर म्हणाले होते. मग बावनकुळेंना कोर्टाने इंडोसमेंट करण्याचे अधिकार दिले आहे का? किती वेड्यात काढणार आहात? हा सरकारचा हस्तक्षेप नाही का? मग बावकुळेंचं पत्र काय आहे? हस्तक्षेप नाही का? असे सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित करा.
काही अक्कल आहे का?
मराठा समाज पेटून उठला आहे. ही परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ नये. मराठा समाजावर अन्याय होऊ नये. ही इच्छा आहे. मंत्रिपदाचा गैरवापर करून जाणूनबुजून हेच केलं आहे. बावनकुळेंनी मराठा समाजावर अन्याय केला आहे. सरकार नवीन नवीन डाव शोधत आहे. मराठा समाजाच्या नोंदी रद्द केल्या जात आहे. काही तरी खोटं बोलत आहे. नोदींतील क्षुल्लक चुका दाखवल्या जात आहे. कुठे कुणबा लिहिलंय, कुठे पेनाने लिहिलंय, कुठे शाईने लिहिलंय, तर कुठे हस्ताक्षरात बदल आहे, असे बहाणे दिले जात आहे. गावात आलेले तलाठी बदलले की नाही? दर वर्षी तलाठी बदलतो. अक्षर बदलतात. एकच तलाठी 50-50 वर्ष एकाच गावात राहतो का? बावनकुळे काही तर बहाणे करत आहेत. बावनकुळेंना काही अक्कल आहे का? मला कळत नाही, असा हल्लाच त्यांनी चढवला.