जरांगेंचं आंदोलन, ओबीसी नेत्यांची पहिली प्रतिक्रिया; दोन नेते काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटीतील आंदोलनावर ओबीसी नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. लक्ष्मण हाकेंनी सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप करत भुजबळांनाही लक्ष्य केले. तर डॉ. बबनराव तायवाडेंनी ओबीसी महासंघाची भूमिका मांडत, मराठा आरक्षणासाठी ओबीसींच्या हक्कांवर गदा आल्यास ५८ लाख नोंदी असलेल्या ओबीसींचा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत आजपासून आंदोलन सुरू केलं आहे. जरांगे यांचं हे शेवटचं आंदोलन आहे. त्यासाठी त्यांनी मुंबईत यायचीही तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. सरकारवर जरांगे यांच्या आंदोलनाने दबाव आला आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच ओबीसींच्या दोन नेत्यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आणि बबनराव तायवाडे यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.
ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके यांनी मीडियाशी संवाद साधताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्व पुढारी मनोज जरांगे यांच्या बाजूने आहेत. सरकारचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. जरांगे पाटील यांनी शासनाला मोजलं नाही तर ते आम्हाला कसं मोजतील? असा सवाल करतानाच मनोज जरांगे यांच्या मागणीचे आणि सरकार देत असलेल्या प्रतिसादाचे परिणाम पुढील पाच वर्षात पाहण्यास मिळतील मला हे भुजबळ साहेबांना सांगायचं आहे, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
तो भुजबळांचा प्रश्न
मनोज जरांगे यांना आरक्षणामधलं काही कळत नाही. मनोज जरांगे ज्या भाषेत बोलतील त्याच भाषेत आम्ही बोलणार आहोत. आंदोलनासंदर्भात सरकार हे बेजबाबदारपणे वागत आहे. सरकारने मनोज जरांगे यांना आरक्षणासंदर्भात समजून सांगितलं पाहिजे. सरकारमधील लोक हे नालायक आहेत, असा हल्ला चढवतानाच भुजबळ साहेबांनी काय भूमिका घ्यायची हा त्यांचा प्रश्न आहे, असं हाके म्हणाले.
विखे घराण महाराष्ट्राच्या बोडक्यावर
हाके हे विधान परिषदेसाठी धडपड करत असल्याचा आरोप राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. विखे यांच्या या आरोपावरही हाके यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लक्ष्मण हाके यांच्या मागे कोणीच नाही. विखे पाटील यांच्यासारखा नेता महाराष्ट्राच्या बोडक्यावर बसलेला आहे. हे कायम स्वरूपी मंत्रिपद मिळवणारे विखे घराणे आहे, असा हल्लाच हाके यांनी चढवला आहे.
तर ओबीसी रस्त्यावर उतरेल
दरम्यान, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 58 लाख नोंदी आमच्या ओबीसींच्याच आहेत. त्यांना प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर ओबीसी समाज लक्ष ठेऊन आहे. आम्ही वेट ॲंड वॅाचच्या भूमिकेत आहोत. सरकारने ओबीसी समाजाच्या ताटातून काढून दिलं, तर ओबीसी समाज मराठा समाजापेक्षा जास्त संख्येने रस्त्यावर उतरेल, असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.
५८ लाख नोंदी जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु झाल्या नंतरच्या नाही, तर या नोंदी १९८३ ते २०२४ पर्यंतच्या आहेत. ५८ लाखांपैकी ३८ लाख प्रमाणपत्र दिलेय, त्यांच्या व्हॅलीडीटी पण झाल्या आहेत. मराठा वगळता सर्व प्रमाणपत्रधारकांना व्हॅलिडीटी मिळाली आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर ५९ हजार नोंदी मराठ्यात मिळाल्या. त्यापैकी ३ लाख ११ जणांना जात प्रमाणपत्र दिले, अशी माहितीही त्यांनी दिली.
