Pune | शरद पवार रात्रीच्या अकरा वाजता MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचं दिलं आश्वासन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एमपीएससी परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे रात्रीच्या अकरा वाजता शरद पवार हे स्वत: आंदोलनस्थळी दाखल झाले.

Pune | शरद पवार रात्रीच्या अकरा वाजता MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचं दिलं आश्वासन
Chetan Patil | Updated on: Feb 21, 2023 | 11:55 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Pune Sharad Pawar) यांनी एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतलीय. विशेष म्हणजे रात्रीच्या अकरा वाजता शरद पवार हे स्वत: आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एमपीएससीचं नवीन अभ्यासक्रम हे 2025 सालापासून लागू करण्यात यावं, अशी प्रमुख मागणी या विद्यार्थ्यांची आहे. या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल स्वत: शरद पवार यांनी घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह संचारलाय. शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांसाठी चर्चा केली.

तुमचा प्रश्न मार्गी लागणार, असं आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिलं. शरद पवार यांच्या या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष सुरु केला. यावेळी शरद पवार यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. पण विद्यार्थ्यांचा जल्लोषाचा आवाज इतका मोठा होता की एवढ्या गर्दीत शरद पवार यांचा आवाज दूपर्यंत पोहोचत नव्हता. पण विद्यार्थ्यांना आवाहन केल्यानंतर ते शांत झाले आणि शरद पवार बोलू लागले. विशेष म्हणजे शरद पवार यांनी आंदोलनस्थळावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला.

‘कुलगुरुंचं पत्र मिळालं, विद्यार्थ्यांची मागणी रास्त’

विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आयोगाने काही बदल केलेला आहे, असं पत्र मला काल मिळालं. हे पत्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सी. जी. पाटील यांनी लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं की, विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आपण स्वत: उपस्थित राहून मार्ग काढावं, असं पत्रात म्हटलं आहे, असं शरद पवार म्हणाले.

“मी फक्त एवढ्याचसाठी सांगतोय की, तुम्ही जसं आंदोलनाच्या माध्यमातून म्हणणं मांडत आहात तसंच म्हणणं कुलगुरुंनी लेखी मांडलं आहे”, असं शरद पवार यांनी सांगितलं. त्यानंतर विद्यार्थ्यांचा जोरदार टाळ्या वाजवण्याचा आवाज येतो.

“मी इथे येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. त्यांचं म्हणणं असं आहे की, तुमचे प्रतिनिधी, विद्यार्थ्यांचे कुलगुरु आणि आयोगाचे प्रतिनिधी यांच्यासोबत दोन दिवसात बैठक घेण्यास तयार आहेत. तुमच्यावतीने कोण येणार ते मला माहिती नाही. त्याची नावे तुम्ही मला द्यायची. मी बैठकीची जबाबदारी घेतो. मुख्यमंत्र्यांची बैठक होईल”, असं शरद पवार म्हणाले.

“ज्या अर्थी कुलगुरु मला लेखी देतात की विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत. त्यांच्या अभ्याक्रमात ऐनवेळी बदल करणं योग्य नाही हे कुलगुरु सांगत असतील तर त्याची नोद सरकारला घ्यावी लागेल”, असं शरद पवार म्हणाले.

‘पाच जणांची नावे तुम्हाला मान्य आहेत का?’

आपल्याला मुख्यमंत्र्यासोबत बोलावलं लागेल. ती बैठक मी घडवून आणतो. मी स्वत: हजर राहतो. तुमच्यावतीने कोण येणार? असं शरद पवार यांनी विचारलं. त्यानंतर आंदोलक विद्यार्थ्याने पाच जणांची नावे सांगितली. त्यावर पवारांनी चौफेर बसलेल्या विद्यार्थ्यांना तुम्हाला ही पाच नावे मान्य आहेत का? असं विचारलं. त्यावर सर्व आंदोलकांनी होकार दिला.

विशेष म्हणजे या आंदोलनस्थळी एका विद्यार्थ्याला आज संध्याकाळी भोवळ आल्याची माहिती समोर आली होती. आंदोलन करणारे विद्यार्थी हे सुशिक्षित आहेत. ते उद्याचे अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिलं जावं, अशी अनेकांची मागणी आहे. याच विचारातून अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील या आंदोलनाची दखल घेतल्याची माहिती समोर आली होती.

Follow Us