सर्वात मोठी बातमी ! ओबीसी नेत्यांमध्ये फूट? 1 सप्टेंबरच्या मोर्चाआधीच… तायवाडे आणि हाकेंमध्ये जुंपली
ओबीसी नेत्यांमध्ये मोठी फूट पडली आहे. लक्ष्मण हाके यांनी १ सप्टेंबर रोजी मुंबईत काढलेल्या ओबीसी मोर्चाला बबनराव तायवाडे यांनी विरोध केला आहे. तायवाडे यांच्या मते, मोर्चाची मागणी स्पष्ट नाही आणि ते सरकारच्या भूमिकेकडे लक्ष देत आहेत. हाके यांनी तायवाडे यांना 'इव्हेंट नेते' संबोधत टीका केली आहे.

ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबर रोजी मोर्चाची हाक दिली आहे. मुंबईत हा मोर्चा येणार आहे. त्यासाठी हाके यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रत्येक ओबीसींनी मोर्चात सहभागी व्हा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच ओबीसी नेत्यांनाही या मोर्चात येण्याचं हाके यांनी आवतन दिलं आहे. मात्र, या मोर्चापूर्वीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडली आहे. ओबीसींचे दुसरे आक्रमक नेते बबनराव तायवाडे यांनी या मोर्चाला आमचा पाठिंबा नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मोर्चापूर्वीच ओबीसींमध्ये फूट पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
बबनराव तायवाडे काय म्हणाले?
मुंबई जाम करायची आहे तर त्यांनी करावीच तो त्यांचा प्रश्न आहे मी सरकारच्या भूमिकेकडे लक्ष देऊन आहे. सरकार ते जे काही मागतात त्याकडे सरकार कोणत्या नजरेने बघते आहे, किती सीरियसली बघते आहे आणि आमच्या आरक्षणाला कुठे धक्का लावते आहे का? याकडे आमचे लक्ष आहे. आम्हाला जे वचन, आश्वासन सरकारने दिले आहे, त्याला धक्का लागणार नाही असं सरकारने सांगितलं होतं. त्यावर सरकार ठाम राहिलं तर आमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. त्यामुळे आम्हाला मुंबई जाम करायची गरज नाही. आमचा मुंबईच्या मोर्चाला पाठिंबा नाही. त्यांच्या मागण्या स्पष्ट नाहीत, असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे.
आमचं आंदोलन रामलीला मैदानावर
ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची आम्ही 2016 पासून केंद्राकडे मागणी करत आहोत. एक वर्षापूर्वी सरकारने जातनिहाय जनगणना करणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र आज होणारी जनगणना जातनिहाय होत नाहीये. केवळ अर्जात जातीचा कॉलम टाकला आहे. त्यात ओबीसींचा कॉलम टाकला नाही. त्यामुळे आमची आर्धी मागणी पूर्ण झाली आहे. मात्र जातीचा कॉलमचा त्यात समावेश झाला नाही. ओबीसीचा कॉलम त्यात समाविष्ट करावा याकरता आम्ही भविष्यात सातत्याने पाठपुरावा करणार आहोत, असं सांगतानाच आम्ही डिसेंबरमध्ये रामलीला मैदानावर ओबीसीच्या कॉलमसाठी आंदोलन करणार आहोत. आपली मागणी लावून धरणार आहोत. ओबीसींचा रकाना जनगणनेमध्ये अॅड करावा, ही मागणी आमची आहे. त्यासाठी आम्ही रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहोत, असंही तायवाडे यांनी सांगितलं.
तायवाडे इव्हेंट नेते
दरम्यान, तायवाडे यांच्या भूमिकेवर लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बबनराव तायवडे हे इव्हेंट नेते आहेत. सकाळी एक भूमिका घेतात, दुपारी एक आणि संध्याकाळी ते एक भूमिका घेतात. आम्ही त्यांना पाठिंबा मागितलाच नाही. ते नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असतात. वर्षाला एकच कार्यक्रम घेणाऱ्या बबनराव तायवडे यांनी मला जास्त बोलायला लावू नये, असा इशाराच हाके यांनी दिला आहे.
मोर्चाचं काय होणार?
लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबर रोजी मोर्चाची हाक दिली आहे. त्यासाठी त्यांनी ओबीसी नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहनही केलं आहे. या मोर्चाला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. मात्र, तायवाडे यांनी वेगळी भूमिका घेतल्याने मोर्चापूर्वीच ओबीसी नेत्यांमध्ये विसंवाद असल्याचं समोर आलं आहे. ओबीसी नेत्यांमध्येच फूट पडल्याचं चित्र दिसत आहे. तसेच या मोर्च्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये जुंपल्याचंही दिसून येत आहे.